कामगार संघटनांचे पेट्रोलियम मंत्र्यांना निवेदन
नवी दिल्ली – पेट्रोलियम क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करणाऱ्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशनसारख्या कंपनीचे खासगीकरण करण्याचा हट्ट केंद्र सरकारने सोडावा, असे आवाहन कामगार संघटनांनी केले आहे.
दहा कामगार संघटनांनी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, संसदेने कायदा करून बीपीसीएल कंपनी निर्माण केली होती. त्यानंतर या कंपनीची क्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जनतेच्या पैशांतून मोठी गुंतवणूक केली आहे. पेट्रोलियम क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्यात या कंपनीने महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
लाभांशाच्या स्वरुपात केंद्र सरकारला वेळोवेळी बरीच रक्कम दिली आहे. असे असूनही केंद्र सरकार या कंपनीचे खाजगीकरण करण्याबद्दल आग्रही आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी हा निर्णय मागे घ्यावा असे या पत्रात म्हटले आहे.