नवी दिल्ली: देशातील करोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या सर्वांच्या चिंतेत भर टाकत आहे. त्यामुळे देशातील करोना कधी नियंत्रणात येणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या प्रश्नाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी उत्तर दिले आहे. “दिवाळीपर्यंत देशात करोना प्रसार नियंत्रणात येईल,” असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
अनंतकुमार फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नेशन फर्स्ट वेबीनार सीरिजचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उद्घाटन केले. करोना नियंत्रणात आणण्यासाठी भारताची कामगिरी चांगली आहे, असे त्यांनी सांगितले.
“या वर्षी दिवाळीपर्यंत करोना नियंत्रणाखाली येईल. नेत्यांसह सर्वसामान्य माणसांनी करोनाच्या साथीविरूद्ध एकजुटीने व प्रभावीपणे लढा दिला आहे. भारतात करोनाचा पहिला रुग्ण आढळून येण्याच्या आधीच आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या आजपर्यंत २२ बैठका झाल्या आहेत,” असे हर्ष वर्धन म्हणाले.