नवी दिल्ली -भारतात गेल्या काही दिवसात करोना रुग्ण वाढत असले तरी देशपातळीवर सरसकट लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता कमी आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
वर्ल्ड बॅंकेचे अध्यक्ष डेव्हिड मेलपास यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करताना सीतारामन यांनी सांगितले की, भारतासारख्या मोठ्या देशांमध्ये पूर्ण लॉक डाऊनचे बरेच आर्थिक परिणाम होत असतात. त्यासाठी स्थानिक पातळीवर काही निर्बंध जारी करण्यात येतील. मात्र सरसकट लॉकडाऊन करण्याच्या शक्यतेवर सरकार विचार करीत नाही.
भारतीय अर्थव्यवस्थेवर लॉकडाउनचा बराच परिणाम झाला आहे. त्यातून भारताला बाहेर निघता यावे यासाठी जागतिक बॅंकेने भारताला विविध क्षेत्रात बरीच आर्थिक मदत देऊ केली आहे, याबद्दल सीतारामन यांनी आभार मानले. भारतात करोनाचे रुग्ण वाढणार नाहीत, त्याचबरोबर लसीकरण वेगात होईल यासाठी अनेक पातळ्यांवर उपाय करण्यात येत आहेत.
भारतात करोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे. याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. त्याचबरोबर तेथील संसर्ग इतर क्षेत्रात पसरू नये यासाठी प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले
पर्यावरणासाठी ऊर्जा संवर्धनावर भर भारतामध्ये ऊर्जा संवर्धनावर भर दिला जात आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनासाठी मदत होत आहे. त्याकरिता लीड बल्बचा वापर वाढविण्यात येत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याससाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. भारतामध्ये येत्या काळात मोठ्या प्रमाणात इथेनॉलचे उत्पादन होणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वेगाने वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.