नवी दिल्ली – राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या एकजुटीसाठी पुढाकार घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी व्यक्तिगत आकांक्षा नसल्याचा पुनरूच्चार केला. मुझे कुछ नहीं चाहिए (मला काहीच नकोयं), अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
इंडिया या नावाने विरोधी पक्षांची आघाडी उभी राहण्यासाठी सर्वांधिक प्रयत्न करणाऱ्या नेत्यांमध्ये नितीश यांचा समावेश आहे. त्यामुळे त्या आघाडीचे समन्वयक हे पद मिळवण्यासाठी ते आग्रही असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याशिवाय, नितीश यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले जावे, अशी मागणीही त्यांच्या पक्षाकडून (जेडीयू) पुढे आली. त्यासंबंधीच्या प्रश्नांची सरबत्ती पत्रकारांनी नितीश यांच्यावर केली.
कुठल्याही पदाची आकांक्षा नसल्याची भूमिका मी सुरूवातीपासून मांडत आहे.आघाडीच्या समन्वयक पदाची जबाबदारी इतर कुणाकडे सोपवली जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीआधी भाजपला विरोध असणाऱ्या अधिकाधिक पक्षांना एकत्र करणे एवढीच माझी इच्छा आहे. केवळ त्याच दिशेने मी कार्य करत आहे, असे ते उत्तरादाखल म्हणाले.
इंडियामध्ये आणखी काही पक्ष सहभागी होतील. पुढील बैठकीत त्याविषयी घोषणा केली जाईल, असे नितीश यांनी रविवारी म्हटले होते. मात्र, त्या पक्षांची नावे उघड करण्याचे त्यांनी टाळले. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीचे महत्व आणखी वाढले आहे.