काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा देशाची राजधानी दिल्लीत दाखल झाली, असून पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा शनिवारी यात्रेत सामील झाले.
यात्रेदरम्यान राहुल गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ते द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी आले आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जयराम रमेश म्हणाले की, भाजप नेत्यांनाही भारताला एकसंध करण्याच्या या प्रवासात सहभागी व्हायचे असेल तर त्यांचेही स्वागत आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जयराम रमेश म्हणाले, ‘भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे. नितीन गडकरी असोत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह असोत किंवा माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू असोत. भारताला एकत्र आणण्यावर आणि द्वेषाचा सामना करण्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे या प्रवासात सहभागी होण्यासाठी स्वागत आहे.’
दरम्यान, जयराम रमेश यांचे हे विधान तेव्हा आले आहे जेव्हा यापूर्वीचे काँग्रेस खासदार मणिकम टागोर म्हणाले होते की राहुल गांधी यांनी शुक्रवारी समविचारी विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून त्यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. अनेक खासदारांनी या यात्रेत सहभागी होण्याची तयारी दर्शवल्याची माहिती मणिकम टागोर यांनी दिली.