हिंगोली: शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कारवाईमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच सरनाईक यांच्यानंतर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीच्या नोटिसा बजावल्या आहेत,असा खळबळजनक दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
हिंगोलीत नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्या ची माझी माहिती असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
नातेवाईकांना नोटिसा मिळाल्यामुळेच संजय राऊत जास्त फडफडत आहेत. तसेच, ईडीच्या कारवाईमुळेच संजय राऊत हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नव्हते ना?, अशीही मला शंका असल्याचेही नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सध्या मी कोविड-19 नियमानुसार क्वारंटाईन आहे. त्यामुळे मला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच माझा मुलगा विहंग सरनाईक यांची पत्नीही आजारी आहेत. त्यामुळे दोघांचीही पुढच्या आठवड्यात चौकशी करावी, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडीकडे केली होती. प्रताप सरनाईकांच्या या विनंतीनंतर ‘क्वारंटाईन झाल्यानंतर हजर राहा, असा आदेश प्रताप सरनाईकांना ईडीकडून दिला आहे.