नवी दिल्ली – येस बॅंक आर्थिक दृष्ट्या डबघाईला आल्यामुळे आर्थिक क्षेत्रात मोठेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पण आज या विषयावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याचाही ठपका आधीच्या कॉंग्रेस सरकारवरच ठेवला आहे. त्यांनी म्हटले आहे की देशातील बॅंकिग घोटाळ्यांना देशात सन 2004 ते 2014 या काळात सत्तेवर असलेले सरकारच जबाबदार आहे. या काळात मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकार सत्तेवर होते. तथापी हे सरकार आजच्या येस बॅंक घोटाळ्यांना कसे जबाबदार आहे याचा तपशील मात्र त्यांनी सांगितला नाही.
त्या उलट कॉंग्रेसने कालच या घोटाळा प्रकरणात मोदी सरकारला धारेवर धरताना म्हटले आहे की सन 2014 च्या आर्थिक वर्षात येस बॅंकेने दिलेल्या कर्जाचे प्रमाण 53 हजार कोटी रूपये इतके होते ते गेल्या पाच वर्षात तब्बल 2 लाख 30 हजार कोटी रूपये इतके कसे झाले असा सवाल माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी विचारला होता. त्यावर मात्र विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणतेही भाष्य केले नाही. वित्तीय संस्थांमधील पेच प्रसंग हाताळण्याची मोदी सरकारकडे क्षमता नाही असे मतही चिदंबरम यांनी व्यक्त केले होते.
दरम्यान आज पत्रकारांशी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, येस बॅंकेने अडचणीत आलेल्या संस्थांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केल्याने ही बॅंक अडचणीत आली आहे. अनिल अंबानी यांचा उद्योग समुह, दिवाण हाऊसिंग फायनान्स, व्होडाफोन, एस्सेल अशा कंपन्यांना त्यांनी कर्ज दिली होती ही बाब त्यांनी निदर्शनाला आणून दिली. येस बॅंकेच्या संबंधात निर्माण झालेली स्थिती तात्पुरती असून तेथील खातेदारांचा पैसा सुरक्षित राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.