माहिती अभावी पहिल्या दिवशी जुजबी प्रतिसाद
मुंबई – पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतुन मुंबईत नाईट लाईफ ही संकल्पना सुरू झाली असून 26 जानेवारीच्या रात्री पहिल्यांदाच काही भागातील हॉटेल्स व मॉल सुरू ठेवण्यात आले होते. पण या पहिल्या दिवशी माहिती अभावी लोकांचा मात्र जेमतेमच प्रतिसाद मिळाला. गेल्या 22 जानेवारीला राज्यमंत्रीमंडळाने हा प्रस्ताव मान्य केला आहे. मुंबई 24 तास सुरू ठेवण्याची ही संकल्पना आहे. सुरूवातीला बिगर रहिवासी भागातील हॉटेल्स आणि मॉल सुरू ठेवले जाणार आहेत. मात्र नरिमन पॉईन्ट, वरळी आणि अन्य भागातील शॉपिंग मॉल काल रात्री बंदच राहिले.
या संबंधात बोलताना अदित्य ठाकरे म्हणाले की ही योजना आत्ताशी सुरू झाली आहे. त्याला प्रतिसाद मिळायला काही कालावधी जाऊ द्यावा लागेल. येत्या काही आठवड्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. रात्री उशिरा रस्त्यावर येऊन खरेदी व खाण्याची मजा घेणे सुरक्षित असल्याची खात्री लोकांना पटल्यानंतर लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पहिल्याच दिवशी या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षाच नव्हती. या योजनेत जो एरिया सुरूवातीला मान्य करण्यात आला आहे त्यात संपुर्ण रात्रीभर आपली दुकाने किंवा हॉटेल्स सुरू ठेवणे हे मालकांना बंधनकारक नाही. त्यांनी त्यांच्या गरजेनुसार त्यांची दुकाने किंवा हॉटेल्स सुरू ठेवायची आहेत.
अदित्य ठाकरे म्हणाले की मुंबई रात्रंदिवस चालणारे शहर आहे. रात्री उशिरा मुंबईत येणारे प्रवासी किंवा रात्रपाळीतून बाहेर येणाऱ्या कामगारांना कर्मचाऱ्यांनी रात्री हॉटेलात खाण्याची सोय यातून होणार आहे. या धोरणात बार, परमिट रूम्स किंवा पब रात्रभर सुरू ठेवण्यास अनुमती नाही.