मुंबई – दिल्लीच्या शाहीनबाग भागात गेले सुमारे दोन महिने मुस्लिम महिलांनी सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे त्याचाच प्रयोग मुंबईतील महिलांनीही सुरू केला असून दक्षिण मुंबईतील नागपाडा भागात या महिलांनी काल 26 जानेवारी पासून हे धरणे आंदोलन सुरू केले आहे. अरबिया हॉटेलजवळ मोरलॅंड रोडवर रविवारी रात्री या महिलांनी धरणे आंदोलन सुरू केले.
यात सहभागी झालेल्या महिला मदनपुरा, झुला मैदान, अपरीपाडा, आणि मुंबई सेंट्रल परिसरातील आहेत. सोमवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या महिलांची भेट घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याची सुचना केली परंतु त्यांनी ती मान्य केली नाही.
सोमवारी सायंकाळीही त्यांचे हे आंदोलन सुरूच होते. यावेळी सीएए, एनआरसीच्या विरोधात लिहीलेले फलक महिलांनी लावले आहेत तसेच विशेष म्हणजे त्यांनी हिंदु-मुस्लिम एकतेच्याही घोषणा तिथे फलकावर लावल्या आहेत. दिल्लीत 15 डिसेंबर पासून महिलांनी आपल्या मुलाबाळांसह धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे त्याला अन्य महिलांकडूनही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याने त्या आंदोलनातून प्रेरणा घेऊन हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.