बारामती (प्रतिनिधी) – कोरोनच्या पार्श्वभूमीवर मदतीचा ओघ सुरू असला तरी शहरात सील केलेल्या परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरजूंपर्यंत मदतीचा हात अद्याप पोहोचला नाही. घराबाहेर न पडू शकणारे गरीब जीवनावश्यक वस्तूंच्या अद्यापही प्रतीक्षेत आहेत .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील भिगवन रोड लगत असलेल्या श्रीराम नगर पासून तीन किलोमीटर परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. अत्यावश्यक गरजे व्यतिरिक्त येथील नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. रोजंदारीवर जाणाऱ्या व झोपडपट्टीत राहणाऱ्याची संख्यादेखील या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. प्रशासनाच्या मदतीने दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा काही प्रमाणात होत आहे.
मात्र येथील परिस्थिती पाहता जीवनावश्यक वस्तूंची मदत झोपडपट्टीतील कुटुंबांना होणे गरजेचे newsआहे. येथील स्थानिक नगरसेवक तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात मदतीची गरज निर्माण झाले आहे. या परिसरातील गरजू व गरिबांना एक हात मदतीचा देण्याची गरज आहे.
“बारामती शहरातील श्रीराम नगर सेंटर धरून त्याच्या आसपासच्या तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य आहे. या परिसरातील नागरिक देखील स्वयंशिस्त पाळत आहेत. मात्र येथील झोपडपट्टीतील गरीब जनतेला सध्या जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील इतर ठिकाणी मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र सील केलेला परिसर मदतीपासून दुर्लक्षित झाला आहे. या परिसरातही एक हात मदतीचा मिळाला तर गरीब जनतेला आधार मिळेल.
-दीपक मलगुंडे, माजी पंचायत समिती सदस्य