कोहलीचे आरसीबी सहकाऱ्यांना आवाहन
नवी दिल्ली, दि. 3 -इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) अद्याप एकही विजेतेपद मिळवू शकलो नाही हे मान्य, पण भविष्यात ते स्वप्न आम्ही निश्चितच पूर्ण करु. केवळ मैदानावरील कामगिरी नव्हे तर ड्रेसिंगरुममधील खेळाडूंमध्ये खेळीमेळीचे वातावरण असणे जास्त महत्वाचे आहे, असे मत रॉयल चॅलेंजर बेंगळूरू (आरसीबी) संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले आहे.
इंग्लंडचा माजी कसोटीपटू केविन पिटरसन याच्याशी कोहलीने सोशल मीडियावर सुरु असलेल्या एका चॉट-शोमध्ये संवाद साधला त्यावेळी हे मत व्यक्त केले. तुम्ही अद्याप एकदाही ही स्पर्धा का जिंकू शकला नाही, असा सवाल या संवादादरम्यान पीटरसनने कोहलीला विचारला होता, त्यावर कोहलीने हे उत्तर दिले.
आपण एक लक्ष्य समोर ठेवुन वाटचाल करत असतो, पण काहीवेळा अशा प्रयत्नात ते लक्ष्य आपल्यापासून आणखी लांब जात असल्याचे जाणवते. खरेतर आमच्या संघात जगातील दादा फलंदाज आहेत, तसेच अव्वल अष्टपैलु देखील आहेत. मात्र, तरीही आम्ही ही स्पर्धा आजवर एकदाही जिंकू शकलो नाही याची खंत आम्हाला सगळ्यांनाच वाटते. आता या स्पर्धेला 12 वर्षे पूर्ण झाली असली तरीही आम्ही या अपयशातून अद्याप बाहेर येऊ शकलेलो नाही. पण आम्ही निराश झालेलो नाही ही स्पर्धा आम्ही येत्या काळात निश्चितच जिंकू असा मला विश्वास आहे, असेही कोहलीने व्यक्त केले.
पहिल्या स्पर्धेपासून आतापर्यंत आमचा संघ पाहिलात तर जगातील सर्वात चांगले खेळाडू आमच्याकडे आहेत आणि त्यांची दर्जाला साजेशी कामगिरी अद्याप झालेली नाही हे देखील मी मान्य करतो, पण म्हणून त्यांच्या गुणवत्तेवर शंका घेणे योग्य नाही. काहीवेळा आपल्या योजना यशस्वी होत नाहीत. त्याचबरोबर सामन्यातील परिस्थितीनुसार खेळही होत नाही, हे सर्व मला मान्य आहे. मलाही काहीवेळा अपयश आलेले आहे. मात्र, इतकेच सांगू शकतो की या सगळ्या नकारात्मक गोष्टींवर येत्या काळात आम्ही निश्चितच मात करु व विजेतेपद प्राप्त करु, असा विश्वासही कोहलीने व्यक्त केला.
करोनाच्या धोक्यामुळे सध्या क्रिकेटसह सर्व स्पर्धा एकतर रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल देखील 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, करोनाचा धोका अद्याप संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने ही स्पर्धा कधी होईल हे देखील सांगता येत नाही.आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वगळता अन्य सर्व संघांनी ही स्पर्धा जिंकण्यात यश मिळविले आहे.