ठाणे – “हे सरकार काही महिन्यांचे, काही दिवसांचे नाही तर काही तासांचेच आहे. आम्ही सत्तेत आल्यावर सगळ्याचे मोजमाप करु, अशी घणाघाती टिका शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या(मविआ) वतीने बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता, त्याप्रसंगी आदित्य बोलत होते.
“एका व्यक्तीच्या स्वार्थापायी सरकार उलथवले. आम्ही लवकरच पुन्हा सत्तेत येणार, ज्यांना जागा दाखवायची त्यांना जागा दाखवणार, असा हल्लाबोलही आदित्य यांनी यावेळी केला. यावेळी सुषमा अंधारे तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.
मोर्चाला संबोधित करताना आदित्य पुढे म्हणाले, आमचे सरकार आल्यानंतर गद्दार गॅंगचे जे आयपीएस, आयएएस आणि इतर अधिकारी आहेत, त्यांच्याविरोधात बदल्याच्या भावनेतून नाही तर लोकांसाठी आम्ही चौकशी करु आणि त्यांना तुरूंगात टाकू. आजच्या मोर्चाला तब्बल 17 अटी घालण्यात आल्या. टाका, आमच्या सगळ्यांवर केसेस टाका. पुन्हा एकदा होऊनच जाऊदे.
पोलीस आयुक्तांच्या ऑफिससाठी आम्ही एक टाळे आणलेले आहे. कारण जेव्हा मिंधेंच्या गद्दार गॅंगच्या टोळींनी जेव्हा शिंदे ताईंवर हल्ला केला. तेव्हा तक्रार घ्यायला ते तयार नव्हते. उद्धवसाहेब चिडून पोलीस आयुक्तालयात गेले तर, पोलीस आयुक्त पळून गेले होते.
मुख्यमंत्र्यांना चॅलेंज
मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला आलो आहे. तुम्ही ज्याला स्वत:चा बालेकिल्ला मानता(आता मानत नाही) त्या ठाणे शहरात आलो आहे. तुम्हाला आव्हान आहे की, मी ठाण्यातून लढून जिंकून दाखवणार. ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत, असे म्हणत आदित्य यांनी मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान दिले.
आधी घरात घुसलेल्या बाईचा बंदोबस्त करा- अंधारे
“देवेंद्र फडणवीस म्हणतात, मी फडतूस नाही तर काडतूस आहे. पण 2016 ला तुमच्या घरामध्ये एक बाई घुसली, ती तुमच्याच बायकोवर नजर ठेवून होती. ती कॅमेरा घेऊन आली, काय-काय रेकॉर्ड करून घेऊन गेली ज्याचा तुम्हालाच पत्ता नाही. आधी तिचा बंदोबस्त करा. त्यामुळे तुम्ही काय घुसायची भाषा करता?,’ असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी फडणवीसांना केला. अंधारेंनी यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचाही चांगलाच समाचार घेतला.
त्या म्हणाल्या, काल बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना मातोश्रीच्या बाहेर पडू देणार नाही, असे म्हटले. तर मला चंद्रशेखर भाऊंना विचारायचे आहे, भाऊ जर तुमची पक्षात इतकी ताकद आहे तर तुमचे तिकीट त्याच फडणवीसांनी का कापले? ज्यांना आपली उमेदवारी वाचवता आली नाही त्यांच्यात हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्रीसमोर येऊन दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले.
या जनतेनेच इंदिरा गांधी यांना घालवले होते. आता ही जनता शांत आहे म्हणून तिला तुम्ही गृहित धरु नका. ती तुम्हालाही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. आपले झेंडे वेगवेवगळे असले तरी आता रक्ताचे नाते आहे. त्यामुळे आपल्याला आपापसांत लढायचे नाही तर जिंकायचेच आहे.
-जितेंद्र आव्हाड, आमदार राष्ट्रवादी