मुंबई – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची प्रसिद्ध इमारत विकत घेण्याच्या तयारीत आहे. मंत्रालयाच्या अगदी जवळ असलेली ही इमारत खरेदी करून सरकार मंत्रालयाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे.
इमारतीची मालकी असलेल्या एआय ऍसेट्स होल्डिंग लिमिटेडने राज्य सरकारच्या 1,600 कोटी रुपयांच्या अंतिम ऑफरला यापूर्वी तत्त्वतः मान्यता दिली होती. केंद्र सरकारने तिथली सगळी कार्यालये हलवून 100 टक्के इमारतीचा ताबा आमच्याकडे दिल्यासच हा करार प्रत्यक्षात उतरणार असल्याचेही एका वरिष्ठ मंत्र्यांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेत महाराष्ट्र सरकारला ही इमारत विकण्याच्या प्रयत्नात सहकार्य करण्याची विनंती केली होती. एअर इंडियाच्या या इमारतीत सध्या जीएसटी आणि आयटी विभागाची कार्यालये आहेत.
एअर इंडियातील सुत्रांच्या माहितीनुसार या इमारतीची एकूण किंमत 2,000 कोटींहून अधिक आहे. परंतु सरकारला एअर इंडियाकडून सुमारे 300 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करायची असल्याने वसुलीही होईल आणि मोक्याच्या ठिकाणची ही जागाही सरकार दरबारी जमा होईल, असा सरकारचा कयास आहे.
ठाकरे सरकारने देऊ केले होते 1450 कोटी
नरिमन पॉइंट येथे मंत्रालयाजवळ असलेली ही आलिशान इमारत 1993च्या साखळी बॉम्बस्फोटात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती. प्रचंड आर्थिक संकटातून जात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एअर इंडियाने 2018 मध्ये ही 23 मजली इमारत विकण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती खरेदी करण्यात रस दाखवला होता.
मंत्रालयाचे काम एकाच छताखाली आणणे हा त्या मागचा उद्देश होता. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यात सत्तापरिवर्तन झाल्याने खरेदीची चर्चा बारगळली आणि हा व्यवहार पुढे जाऊ शकला नाही. ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनेही खरेदी प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न करत 1450कोटींची ऑफर दिली होती. परंतु तो करार तांत्रिक कारणास्तव प्रत्यक्षात उतरला नाही.