नवी दिल्ली – देशातील अनेकांनी माझी कारकीर्द संपली, तसेच माझा खेळ पूर्वीसारखा होत नाही, अशा शब्दात माझ्यावर टीका केली आहे. मात्र, या टीकेचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट या टीकेमुळे मला यश मिळविण्याची जिद्द मिळाली असून येत्या काळात टोकियो ऑलिम्पिकचे पदक मिळविण्यासाठी मला प्रेरणा मिळाली असून हे ध्येय मी निश्चितच गाठेन, असा विश्वास भारताचा अव्वल कुस्तीपटू सुशीलकुमार याने व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून अनेकांनी माझ्यावर व माझ्या खेळावर टीका केली आहे. त्यांनी सातत्याने माझ्या गुणवत्तेवर देखील शंका घेतली आहे. मात्र, यामुळे मी निराश होत नाही उलट याच लोकांना प्रत्यक्ष कामगिरी करून आपला दर्जा सिद्ध करण्याची जिद्द मिळते, असेही तो म्हणाला.
यापूर्वी दोन वेळा मी देशाला ऑलिम्पिकचे पदक मिळवून दिले आहे. कारकिर्दित मला 3 ऑलिम्पिक खेळण्याची संधी मिळालेली आहे. टोकियो ऑलिम्पिकद्वारे मी चौथे ऑलिम्पिक खेळणार आहे. त्यामुळे कोण काय म्हणते याचा मी विचार करत नाही केवळ माझ्या सरावावर तसेच तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले आहे, असेही त्याने सांगितले.