मुंबई : करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रसार रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
राज्याच्या काही भागात करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. तिथला संसर्ग रोखण्यासाठी संबंधित गावे, वाड्या, वस्त्या, सोसायट्या सील केल्या जात आहेत. यामुळे सध्या गैरसोय होत असली, तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे, असेही अजित पवार म्हणाले.
आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी सरकारने लॉकडाऊनचा काळ वाढवला आहे.
लोकहितासाठी घेतलेल्या 30 एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनला राज्यातील जनतेने सहकार्य करावे. प्रत्येकाने घरातंच थांबावे. डॉक्टर, पोलीस, शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे. हा लॉकडाऊन यशस्वी झाला, तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही, याचा विचार करुन राज्यातल्या प्रत्येकानेच करोनावर मात करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन त्यांनी केले आहे.