मुंबई – “राज्यकारभार करायला मुख्यमंत्री झाला आहात की आराम करण्यासाठी? ऐरवी उद्धव ठाकरेंचे आजारपण काढणारे तुम्ही आणखी किती दिवस आराम करणार आहात?’, अशी सडकून टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.
एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या सातारा येथील दरेगावी मुक्कामी आहेत. शिंदे यांची तब्येत खराब असल्याने ते आपल्या मुळ गावी विश्रांतीसाठी गेले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केंद्राच्या गृहविभागाकडून यंदा महाराष्ट्रातील एकाही पोलिस कर्मचाऱ्याला शौर्यपदक देण्यात आले नसल्याचे वृत्त आहे. त्यावरूनही राऊतांनी शिंदेंना धारेवर धरले. राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या कर्तबगार, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी यावर बोलायला हवे. केंद्राकडून, दिल्लीकडून महाराष्ट्राचा वारंवार अपमान होत आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी तरी शिंदेंनी तोंड उघडायला हवे होते. महाराष्ट्रातील महत्त्वाची कार्यालये गुजरातला हलवली जात आहेत. प्रकल्प पळवले जात आहे. यावर मुख्यमंत्री बोलणार की नाही? आजारपणावरून उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांच्या गळ्यात आता गुलामगिरीचा पट्टा बांधला गेला आहे. त्यावर त्यांनी आधी बोलायला हवे.
युती भाजपनेच तोडली
राऊत यावेळी बोलताना पुढे म्हणाले, शिवसेना-भाजप युतीचा मित्रकाळ 25 वर्षांचा होता व त्या मित्रकाळात मोदी-शहा कोठेच नव्हते. 2014 सालात गुजरातची ही जोडी दिल्लीच्या राजकारणात अवतरली व त्यांनी “मित्रकाळ’ युती तोडली. मोदी 2019 चा दाखला देतात, पण मुळात युती 2014 सालात भाजपने एका जागेवरून युती तोडली. एकनाथ खडसे तेव्हा भाजपात होते व युती तोडत आहोत, असे उद्धव ठाकरे यांना अधिकृतपणे सांगण्याची जबाबदारी पक्षाने खडसेंवर सोपवली होती.
मोदी यांना हे माहीत नसावे? ते कोणाला चुकीची माहिती देत आहेत? 2019 साली दिलेला शब्द पाळला नाही म्हणून दुसऱ्यांदा युती तुटली. यासह, 2019मध्ये एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री करा, असे उद्धव ठाकरेंचे म्हणणे होते. मात्र, तेव्हा भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास नकार दिला होता. त्यामुळेच युती तुटल्याची आठवणही राउतांनी यावेळी सांगितली.