नंदुरबार,दि.13- राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेत प्रवेश केल्यानंतर आमच्यावर झालेले खोक्याचे आरोप बंद झाले. नाहीतर आम्ही आयुष्यभर खोके-खोके, 50 कोटी हेच एकले असते, असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच, “सत्तेत आता आम्ही तीन पार्टनर झालो आहोत. बाळसाहेब ठाकरे यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना या पदावर पोहोचवल्याचे आहे,’ असेही पाटील पुढे म्हणाले.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुल आणि यासह विविध संस्थांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर देखील पाटील यांनी यावेळी भाष्य केले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काल काही तरी इलू-इलू झाले असल्याचे पाटील यांनी म्हटले. मंत्रीपदासाठी शिवलेल्या कोटवर देखील पाटील यांनी वक्तव्य केल्याने उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. राज्यात अलीकडे झालेला शपथविधी हा सकाळ, संध्याकाळ आणि दुपार या तिन्ही वेळ पूर्ण झाल्याचा टोला देखील त्यांनी मारला.
आता अनेकांनी कोट टांगून ठेवलेत
मी पहिल्यांदा मंत्री झालो त्यावेळेस कोट शिवला होता. मात्र आता अनेकांनी कोट टांगून ठेवले असल्याचा टोला मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांना गुलाबराव पाटील यांनी मारला. त्यामुळे मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीमुळे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला.