मुंबई – राज्यात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 5 टक्के पाॅझिटीवेहीटी रेट आणि ऑक्सिजन 25 टक्के बेड आहेत, तेथे लाॅकडाऊन राहणार नाही. याठिकाणी माॅल्स, हाॅटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही असेही त्यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रम लग्न सोहळा यास मंजूरी देण्यात आली असून 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
त्यानुसार, उद्यापासून पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे उठणार असून सर्व दुकाने, उद्याने, थिएटर्स, सलून असं सगळं उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अनलॉक होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, नागपूर, औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नांदेड, नाशिक, परभणी, जालना, लातूर, यवतमाळ, वर्धा, धुळे, वाशिम, जळगावचा समावेश आहे.
लोकलबाबत काय निर्णय –
पुढील आठवड्यात मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर लोकल सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याबाबत खुद्द विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे. ‘सध्या मुंबई ही दुसऱ्या टप्प्यात येत असून येथील करोना परिस्थिती अधिक सुधारल्यानंतर म्हणजेच पहिल्या टप्प्यात आल्यानंतर लोकल सेवा सुरु केली जाईल,’ असे त्यांनी म्हंटले आहे.
राज्यातील अनलॉकचे पाच टप्पे पुढीलप्रमाणे –
पहिला टप्पा – सर्व निर्बंध उठवणार
दुसरा टप्पा – मर्यादित स्वरूपात निर्बंध उठवणार
तिसरा टप्पा – काही निर्बंधांसह अनलॉक
चौथा टप्पा – निर्बंध कायम
पाचवा टप्पा – रेड झोन. कडक लॉकडाऊन