चेन्नई – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यासाठी सज्ज असल्याचे सिद्ध झाले. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) चेन्नई संघाचा हा कर्णधार सराव सत्रात मेहनत करत आहेच, पण येथे झालेल्या प्रदर्शनीय खेळात त्याने थेट 5 चेंडूवर 5 षटकार खेचत 30 धावा केल्या व अजूनही आपणच बेस्ट फिनिशर असल्याचे दाखवून दिले.
धोनीसाठी यंदाची आयपीएल स्पर्धा भारतीय संघात परतण्यासाठी खूपच महत्त्वाची मानली जात आहे. त्याने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली तरच त्याच्या नावाचा संघनिवडीसाठी विचार होईल, असे संकेत काही दिवसांपूर्वी निवड समितीनेच दिले होते. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आयपीएलमधील कामगिरीच धोनीला संघात पुनरागमनासाठी निर्णायक ठरेल असे सांगितले होते.
इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्घेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्यानंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्याच्या संघातील पुनरागमनाच्या तसेच त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. खुद्द धोनीनेच याबाबत मला नव्या वर्षात विचारा असे माध्यमांनाही सांगितले होते. आता नव्या वर्षात धोनी चेन्नई संघाकडून आयपीएल खेळणार असून त्यात सातत्यपूर्ण कामगिरी करून पुन्हा एकदा दिमाखात भारतीय संघाकडून फिनिशरची कामगिरी करण्यासाठी अतूर बनला आहे.
मधल्या काळात धोनीच्या नवोदित यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला अनेकदा संधी दिली गेली मात्र त्याला एकदाही आश्वासक कामगिरी करता आलेली नाही. तसेच धोनीचा वारसदार ठरेल असा एकही यष्टिरक्षक फलंदाज भारतीय संघाला मिळालेला नाही, त्यामुळे याच वर्षी ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट
स्पर्धेसाठी संघ निवडताना त्यात धोनीचाच समावेश करण्यात येईल अशीच परिस्थिती आहे. मात्र, त्यापूर्वी धोनीला आपली तंदुरुस्ती व कामगिरी सिद्ध करावी लागणार आहे. त्याचाच पाया म्हणून चेन्नई संघाच्या सराव सत्रात 5 चेंडूतील 5 षटकारांसह केलेल्या 30 धावांचा ट्रेलर ठरून उर्वरित चित्रपट प्रत्यक्ष स्पर्धेत दिसेल अशी अपेक्षा आता धोनीचे चाहते करत आहेत.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत धोनीलाच पुन्हा पाचारण करायचे, का पुन्हा एकदा पंत यालाच संधी द्यायची, या संभ्रमात निवड समिती होती. त्याचबरोबर सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल यालाही काही सामन्यांमध्ये यरष्टिरक्षक म्हणून खेळविले गेले आहे. मात्र, राहुल हा मूळ यष्टिरक्षक नसून केवळ यष्टिरक्षकाची तात्पूर्ती जबाबदारी संभाळणारा बदली खेळाडू आहे, त्यामुळे तो एक भरात असलेला सलामीवीर फलंदाज म्हणूनच संघात असावा हा निवड समितीचा विचार आहे. धोनीने जर कामगिरी सिद्ध केली तर त्यालाच संघात घेणे कर्णधार विराट कोहलीचेही लक्ष्य आहे.
शास्त्री यांच्या मतानंतर धोनीने 2 मार्चपासून चेन्नई संघाबरोबर सराव करण्यास प्रारंभ केला होता. आता प्रत्यक्ष स्पर्धेत धोनी कशी कामगिरी करतो यावरच त्याचे संघातील पुनरागमन निश्चित होणार आहे.