मुंबई – भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुंटे यांनी रविवारी जळगावात बोलताना आमचे न्यायालयात वजन आहे असे वक्तव्य केले आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आमदार संजय कुंटे हे फडणवीस यांचे निकटवर्ती आमदार असल्याचे मानले जाते आणि त्यांनी अशा प्रकारचे विधान करून शिवसेनेच्या हातात कोलितच दिल्याचे मानले जात आहे.
एका विशिष्ट पक्षाच्या नेत्यांनाच न्यायालयांमधून सतत का दिलासा मिळतो आहे असा प्रश्न संजय राऊत हे सातत्याने विचारत आहेत. त्यातच संजय कुंटे यांनी हे विधान केल्याने संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा त्यावरून भाजपला धारेवर धरले आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, न्यायालयाने किरीट सोमय्या यांच्या बाबतीत दिलेला निर्णय हा शंभर टक्के दिलासा घोटाळा आहे. एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांसाठीच न्याय व्यवस्था काम करते आहे काय असा प्रश्न यातून निर्माण होतो. ज्या गोष्टी आम्ही पोलिस किंवा प्रशासनाकडून करून घेऊ शकत नाही त्या गोष्टी आम्ही कोर्टाकडून करून घेतो आमचे तेथे वजन आहे असे कुंटे म्हणाले आहेत याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले.
भाजप नेत्यांना मिळत असलेला दिलासा पाहिल्यानंतर हे वजन नेमके कसले आहे हे आम्ही पहात आहोत असे राऊत यांनी म्हटले आहे.दिशा सलियन, मुंबई बॅंक ते विक्रांत घोटाळा अशा सर्व प्रकरणात भाजप नेत्यांना रांगेत दिलासा मिळाला आहे असेही राऊत यांनी निदर्शनाला आणून दिले. न्याय व्यवस्थेच्या डोळ्यावर जी पट्टी बांधली आहे त्याला एक छिद्र असून त्यातून ते आपल्या लोकांकडे पहात असतात असे विधानही त्यांनी केले आहे. सत्र न्यायालयानेही सोमय्या यांनी बेईमानी केल्याचे शेरे मारले असताना उच्च न्यायालय मात्र या प्रकरणात पुरावे कोठे आहेत असा सवाल कसा काय करू शकते असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.