मुंबई – महाराष्ट्रात करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात दररोज 50 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे. राज्यातील प्रमुख शहरांतील रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, यांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे करोनाची ही साखळी तोडण्यासाठी आता गेल्यावर्षीप्रमाणेच कडक लाॅकडाऊन लागू करण्याची आवश्यकता असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यातील करोना संसर्गाला रोखण्यासाठी केवळ संपूर्ण कडकडीत बंद हाच पर्याय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या रात्री 8 पासून राज्यात कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करावी, अशी मागणी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यानी केली आहे.
जिल्हाबंदी आणि रेल्वेही बंद होणार –
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधातना गेल्या वर्षीप्रमाणेच कडक लाॅकडाऊन लागू होण्याचे संकेत दिले आहेत. कोणालाही बाहेर फिरता येणार नाही. जिल्हाबंदी होणार आणि रेल्वेही बंद होणार असल्याचे संकेत भुजबळ यांनी दिले आहेत. हा लाॅकडाऊन 15 दिवसांसाठी ठेवण्याची गरज असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. नेमके काय निर्बंध असतील, यासंदर्भातील निर्णय उद्या मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत.