मुंबई – राज्यात गेल्या 24 तासात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज दिवसभरात राज्यात 9 हजार 336 नवीन रुग्णांची भर पडली असून 3 हजार 378 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 123 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्क्यांवर पोहचले होते. ते पुन्हा एकदा 95.91 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
करोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यात रुग्णसंख्येत सातत्याने चढ उतार पाहायला मिळालेला आहे. राज्यात दुसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखांच्या जवळ पोहचली होती तर दैनंदिन रुग्णसंख्याही 70 हजारांच्या उंबरठ्यावर गेली होती. ही स्थिती आता नियंत्रणात आली असली तरी दैनंदिन रुग्णसंख्या 10 हजारांच्या टप्प्यावर रेंगाळली असल्याने अजून आरोग्य यंत्रणांपुढील आव्हान कायम असल्याचेच दिसत आहे.
Maharashtra reports 9,336 new COVID cases, 3,378 patient discharges, and 123 deaths in the past 24 hours
Active cases: 1,23,225
Total discharges: 58,48,693
Death toll: 1,23,030 pic.twitter.com/9HCg2IEqGs— ANI (@ANI) July 4, 2021
आजची आकडेवारी पाहता नवीन बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त रुग्णांची संख्या खूपच कमी असल्याचे दिसते. त्याचा परिणाम रिकव्हरी रेटवर झाला आहे. त्याचवेळी सक्रिय रुग्णसंख्याही पुन्हा सव्वालाखाच्या जवळ पोहचली आहे.
दरम्यान, आजच्या स्थितीनुसार, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे. आजपर्यंत एकूण 58,48,693 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात करोनाचे सध्या 1 लाख 23 हजार 225 सक्रिय रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 18 हजार 242 रुग्ण आहेत.
ठाणे जिल्ह्यात 16 हजार 801, कोल्हापूर जिल्ह्यात 14 हजार 701 तर मुबईत 12 हजार 295 सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,25,42,943 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,98,177 (14.33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात 6,38,004 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये असून 4198 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.