कोलंबो – श्रीलंका क्रिकेट मंडळ व खेळाडू यांच्यातील वाद संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. भारताने आपला दुय्यम संघ श्रीलंकेत पाठवल्याची टीका करत श्रीलंकेच्या पाच खेळाडूंनी या मालिकेत खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली सराव करत असून, मालिकेसाठी सज्ज होत आहे, तर दुसरीकडे श्रीलंका संघातील वाद उफाळून आला आहे. हा वाद भारताने दुय्यम संघ पाठवल्यामुळे असल्याचे नाकारले जात असून, श्रीलंका मंडळाने खेळाडूंना केंद्रीय करार पद्धतीत दिलेल्या मानधनाच्या रकमेवरून असल्याचे बोलले जात आहे.
याच पाच खेळाडूंनी मंडळाने दिलेल्या कराराच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. या खेळाडूंमध्ये लसिथ एंबुलडेनिया, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नांडो, अशेन बंडारा आणि कासून रजिता यांचा समावेश आहे.