पुणे (प्रतिनिधी) : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये केशरी शिधापत्रिकाधारकांना गहू व तांदूळ हे धान्य मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता दिले जाणार आहे. गहू आठ रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो या दराने मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ असे अन्नधान्य मिळणार आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. या निर्णयाचा फायदा पुणे जिल्ह्यातील 7 लाख 62 हजार केशरी शिधापत्रिकेमधील 32 लाख 86 हजार नागरिकांना होणार आहे.
केशरी शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेतील अन्नधान्याचा लाभ मिळत नाही.अशा केशरी शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्यांचे धान्य मिळणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केंद्रीय अन्न महामंडळाच्या गोदामामधून धान्याची उचल करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसेल, तरी त्या शिधापत्रिकाधारकांना शासनाने ठरविलेल्या दराने व त्या परिंआणात अन्नधान्य देण्यात यावे. अन्नधान्य वाटप करताना रेशन दुकानदरामे शिधापत्रिकेचा क्रमांक , त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील इतर संपूर्ण तपशील या बाबतची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये घ्यावी. त्या नोंदवहीमध्ये अन्नधान्य घ्यावयास आलेल्या सदस्याची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेऊन त्या ग्राहकास रितसर पावती देण्याच्या सूचना शासनाने रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. अन्नधान्य वाटपामध्ये गैरव्यवहार होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.