ऑस्ट्रेलियात सहा महिन्यांचा लॉकडाऊन पथ्यावर
मुंबई – करोनाच्या धोक्याने ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला स्थगिती मिळाल्यास आयपीएलचे आयोजन करणे शक्य होईल असा अट्टहास आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुरु केल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत मंडळाच्याच एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
करोनाची सध्या देशातील परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. त्यामुळे नव्या वेळापत्रकानुसार आयपीएल स्पर्धेचे आयोजन करणे कठीण आहे. भारत सरकारने परदेशी व्यक्तींचे व्हिसा 14 एप्रिलपर्यंत रद्द केले असल्याने यंदाच्या स्पर्धेत त्यांचा सहभाग अनिश्चित समजला जात आहे. अर्थात नव्या वेळापत्रकानुसार 15 एप्रिलपासून ही स्पर्धा परदेशी खेळडूंशिवाय देखील खेळविणे शक्य नसल्याचेही समोर येत आहे.
त्यामुळे ही स्पर्धा रद्द होणार असे दिसत असतानाही मंडळाने मात्र टी-20 विश्वकरंडक रद्द झाला किंवा पुढे ढकलण्यात आला तर उपलब्ध विंडोमध्ये (सप्टेंबर-ऑक्टोबर) ही स्पर्धा होऊ शकते असे सुचवले आहे. अर्थात हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी तर आवश्यक आहेच मात्र, त्याचवेळी आयसीसी व क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी-20 विश्वकरंडक लांबणीवर टाकणे गरजेचे आहे.