मुंबई – करोनाचा धोका पत्करुनदेखील केवळ पैशांच्या हव्यासापोटी संघ मालकांनी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) खेळविण्याची तयारी दर्शविली आहे. केंद्र सरकारने परदेशी खेळाडूंना व्हिसा दिला तर ही स्पर्धा होऊ शकते, अशी विनंती काही संघ मालकांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केली आहे.
परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला किमान 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. ही स्पर्धा 15 एप्रिलपासून सुरु होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या स्पर्धेत विविध संघांकडून खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंना सरकारने व्हिसा दिला तर त्यांना 1 एप्रिलला भारतात येऊ द्यावे व त्यांना पुढील 14 दिवस देखरेखीखाली ठेवावे. त्यांना करोनाची लागण नसल्याचा वैद्यकीय अहवाल आला की ते 15 एप्रिलपासून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, असेही संघ मालकांकडून मंडळाला सांगितले गेले आहे.
ही स्पर्धा मूळ वेळापत्रकानुसार 29 मार्चपासून सुरु होणार होती, मात्र करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या करोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे ही स्पर्धा रद्द होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे, अशा परिस्थितीतही संघ मालक स्पर्धेसाठी उत्सूक आहेत.