नवी दिल्ली – सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिका सध्या 1-1 अशा फरकाने बरोबरीत आहे. या मालिकेच्या समाप्तीनंतर या दोन संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. त्याचबरोबर टी-20 मालिके प्रमाणे वनडे मालिकेत ही नव्या चेहर्याना संधी दिली जाऊ शकते.
दरम्यान, वनडे मालिकेसाठी कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि बडोदा संघाचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्या यांना संधी दिली जाऊ शकते. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा आताच भारतीय संघात पुनरागमन करणार नाहीत. हे दोघे अजून काही दिवस संघापासून दूरच राहतील.
क्रिकबजच्या माहितीनुसार प्रसिद्ध कृष्णा हा भारतीय संघात स्थान मिळवू शकतो. त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 14 विकेट्स घेतल्या होत्या. तो आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळतो. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर आणि टी. नटराज यांची निवड निश्चित मानली जात आहे. जसप्रीत बुमराहचे नुकतेच लग्न झाले असल्याने त्याला या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे शेवटच्या कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. त्याचबरोबर या मालिकेसाठी पहिल्यांदाच क्रुणाल पंड्याची भारतीय संघात निवड केली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
या अगोदर त्याने टी-20 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच आता नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्याने यामध्ये दोन नाबाद शतक आणि दोन अर्धशतके झळकावली होती. कदाचित पृथ्वी शाॅ आणि देवदत्त पडिकल यांना भारतीय संघात निवडले जाऊ शकते. या दोघांनी या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत.