नवी दिल्ली – मी कोणी ज्योतीषी नाही. मात्र प. बंगालमध्ये आता भारतीय जनता पार्टीचेच सरकार येणार आणि त्याची मला पूर्ण खात्री आहे, असा दावा या पक्षाचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. मला आमचे स्पष्ट बहुमत येताना दिसते आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
राजनाथ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आमचे 18 उमेदवार विजयी करून राज्यातील जनतेने ठोस संकेत दिले आहेत की आता बंगाल विधानसभेचे चित्रही बदलले असेल. त्यामुळे आम्हाला बहुमत मिळेल याची खात्री आहे.
दरम्यान, ममता यांच्यासोबत जी दुर्घटना झाली त्यासंदर्भात बोलताना राजनाथ म्हणाले की, तपास संस्था आणि निवडणूक निरीक्षक यांना त्यात कोणताही घातपात आढळून आलेला नाही. एकट्या ममता दिदींनीच याबाबत आरोप केले आहेत. काहीही असले तरी त्या लवकर बऱ्या होवोत अशी आपली शुभकामना असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षेत त्रुटी राहील्यामुळेच ममतांना दुर्घटनेला सामोरे जावे लागले. मात्र सध्याच्या वातावरणात त्या हताश झाल्या असल्यामुळे त्या भारतीय जनता पार्टीवर आरोप करत असल्याचा दावाही राजनाथ यांनी केला. भाजपने राज्यात कोणताही मुख्यमंत्रिदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. असे असेल तर तुम्हाला पराभवाचा धोका आहे असे पत्रकारांनी सांगितल्यावर राजनाथ म्हणाले की भाजप हा लोकशाहीवर विश्वास असणार पक्ष आहे. निवडणुकीत निवडून आलेले उमेदवारच त्यांच्या नेत्याची निवड करतील.