मुंबई : राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून 1 ते 11 एप्रिल 2020 या अकरा दिवसात राज्यातील 1 कोटी 16 लाख 84 हजार 827 शिधापत्रिका धारकांना तब्बल 31 लाख 81 हजार 700 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.
राज्यात या योजनेमधून सुमारे 16 लाख 20 हजार 190 क्विंटल गहू, 12 लाख 53 हजार 884 क्विंटल तांदूळ, तर 14 हजार 817 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 5 लाख 52 हजार 170 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त मोफत तांदूळ 3 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने देण्यात येत आहे. या योजनेसाठी 3 लाख 50 हजार 82 मे.टन तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जूनमध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे