नवी दिल्ली – करोनाने गेले वर्षभर थैमान घातले. या काळात विश्व समुदाय अक्षरश: बेजार झाला. अखेर करोनावर काही देशांनी लस तयार केली आहे. त्यात ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, भारत यांच्यासोबतच चीनचाही समावेश आहे. करोनाच्या विषाणूचे उगमस्थान ठरलेला चीन मात्र या लसीद्वारेही आपला बाजार मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे.
मात्र वाईटातून चांगले होते त्याचप्रमाणे करोना जगाला काही भल्याबुऱ्या गोष्टी शिकवून जातो आहे. केवळ भारताच्या संदर्भात बोलायचे झाले तर करोनाने भारताला आपली विश्वासार्हत अधिक दृढ करण्याची संधी तर मिळाली आहेच, मात्र गेल्या काही काळात जे शेजारी भारतापासून दुरावले असल्यासारखे वाटत होते त्यांना पुन्हा आपल्याशी जोडून घेण्याची नामी संधीही मिळाली आहे. एकप्रकारे करोना लसीचा आधार घेत कुटील कारस्थान रचणाऱ्या चीनला हा एक हादरा असण्याची शक्यता आहे.
भारतात ऑक्स्फर्ड ऍस्ट्राझेन्काची लस तयार केली जाते आहे. पुण्याच्या सीरममध्ये ती तयार केली गेली असून देशभरात वितरीतही करण्यात आली आहे. आपण प्रचंड क्षमतेने उत्पादन करू शकतो असे सीरमने अगोदरच म्हटले आहे. याशिवाय हैदराबाद येथे भारत बायोटेकची पूर्णत: स्वदेशी लसही भारताने तयार केली आहे. या दोन्ही लसींची किंमत भारत तसेच जगातल्या अनेक गरीब देशांना परवडणारी आहे.
काय आहे चीनचा डाव?
गरीब देशांना कर्ज देण्याचा सपाटा गेल्या काही काळात चीनने चालवला आहे. देशांना कर्जाच्या डोंगराखाली दाबून टाकल्यानंतर त्यांना आपले मिंधे करणे आणि नंतर हवे तसे वापरणे हे चीनचे कुटील कारस्थान चीन सातत्याने करतो आहे. आताही लॅटीन अमेरिका आणि आफ्रिकी देशांची स्थिती करोनामुळे गंभीर झाली आहे.
या देशांना आपली लस विकायचा चीनचा प्रयत्न आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस विकत घेण्याची त्या देशांची ऐपतही नाही. अशा स्थितीत लसीसाठी कर्ज देण्याचीही तयारी चीनने दर्शवली आहे. तब्बल 700 कोटी रूपये कर्ज चीन गरीब देशांना लसीसाठी देणार आहे. याचाच अर्थ लस चीनची आणि ती खरेदी करण्यासाठी कर्जही त्यांचेच असा हा मामला आहे. कर्जाच्या विळख्यात सापडल्यानंतर नंतर चीनला आपला कार्यभाग साधता येणार आहे.
भारताचे शेजारी देश बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका यांनाही गेल्या काळात चीनने विविध प्रकल्पांसाठी मोठे कर्ज दिले आहे. यातील बांगलादेशचा अपवाद वगळता अन्य देशांनी भारताच्या संदर्भात वेगळाच सूर लावलेलाही दिसून आला. आताही लसीची चाचणी आणि नंतर ती विकत घेण्यासाठी कर्ज देण्याची तयारी चीनने या देशांना दर्शवली. मात्र बांगलादेशने चाचणीचा चीनचा प्रस्ताव फेटाळला असून उलट भारताला परवानगी दिली आहे. उलट त्या देशाने सीरम सोबत करार केला आहे.
म्यानमारनेही भारतालाच पसंती दर्शवली आहे. अन्य देशांचे संशोधक आणि परराष्ट्र व्यवहार विभागाचे अधिकारी आणि दूतही भारतासोबत चर्चेत सहभागी झाले आहेत व चर्चेच्या आणि प्रशिक्षणाच्या अनेक फेऱ्याही झाल्या आहेत. भारताच्या लसीवर विश्वास आणि भारतालाच प्राधान्य देण्याचे अनेक देशांनी स्पष्ट केले आहे.
अगोदर आम्ही शेजारी देशांना प्राधान्य देऊ व नंतर जगातल्या अन्य भागाचीही गरज भागवू असे भारताने अगोदरच जाहीर केले आहे. ब्राझिल, मेक्सीको, आफ्रिकेतील काही देश आणि इतरही राष्ट्रे भारताकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत आहेत. पाकिस्तान वगळता शेजारी राष्ट्रेही भारतावरच विसंबून आहेत. एकप्रकारे आज करोनाच्या विरोधात लढ्याचे भारत प्रमुख केंद्र बनला असून दोन लसींसह भारताची ताकद आणि विश्वसनीयताही वाढली आहे.