Sanjay Raut On Navneet Rana : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. प्रचारासाठी सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात आहेत. एकमेकांवर जोरदार टीका सुरु आहेत. अशातच आज अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये बोलताना संजय राऊतांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी राणा यांच्यावर टीका करताना राऊतांची जीभ घसरली. नवनीत राणा यांच्या नाची असा उल्लेख त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीची लढाई देशाची लढाई आहे. ही लढाई बळवंत वानखेडे आणि नाची विरोधातील नाही. एका डांसर विरोधातील नाही. एका बबली विरोधातील नाही. तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे. ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मातोश्री मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मातोश्री विषय अपशब्द वापरले. हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणे हे शिवसेनेचे पहिले आणि नैतिक कर्तव्य आहे. अशा बाईच्या विरोधात शिवसैनिकांनी काम करायला हवे. तिच्या पराभवात शिवसेनेचे योगदान मोठे असला पाहिजे, हा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश असल्याचे लक्षात ठेवा.
अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी चौरंगी सामना (Amravati Lok Sabha Constituency)-
दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी चौरंगी सामना होणार हे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा या रिंगणात उतरलेल्या आहेत, तर काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जिल्ह्यात आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा चांगला जोर आहे. बच्चू कडू हे आधी महायुतीसोबत होते. मात्र नवनीत राणांना विरोध असल्यामुळे महायुतीतून बाहेर पडून त्यांनी दिनेश बुब नामक शिवसैनिकाला मैदानात उतरवले आहे. याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर हे देखील रिंगणात उतरलेले आहेत.
या लोकसभा क्षेत्रात अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहापैकी एकातही भाजपचा आमदार नाही. तरीही भाजपने जोर लावून ही जागा आपल्याकडे ओढून घेतली आहे. नवनीत राणांना उमेदवारी हेच त्यामागचे कारणही आहे. ही जागा जिंकायचीच या जिद्दीने भाजपचे सर्व स्थानिक नेते कामाला लागलेले आहेत.
इथले राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह इतर सर्वच कार्यकर्ते कंबर कसून भिडले आहेत. याशिवाय स्वतः नवनीत राणांचे पती रवी राणा हे देखील आमदार असून त्यांची स्वाभिमान संघटना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान पार पडणार आहे तर 4 जूनला निकाल जाहीर होतील.