Kiran Mane | Ravindra Dhangekar | Vasant More : मनसेचे डॅशिंग नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या ‘वसंत कृष्णाजी मोरे’ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगते वादळ ठरले आहे.
शेती आणि इतर व्यवसाय करणारे मोरे यांचे नेतृत्व निर्भीड आणि संघर्षमय राहिले आहे. मात्र, पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे वसंत मोरे यांनी मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र करत, पक्षातून काढता पाय घेतला. । Kiran Mane | Ravindra Dhangekar | Vasant More
वसंत मोरे यांनी अनेक वर्षांचे मनसेशी असलेले नाते तोडून वंचित आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना वंचित आघाडीची उमेदवारी मिळाली. मात्र, असं असलं तरी आपल्या प्रतिस्पर्धी पक्षातील म्हणेजच ठाकरे गटाच्या किरण माने यांनी वसंत मोरे उर्फ तात्या यांचे कौतुक करणारी पोस्ट लिहली आहे.
सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्याच कारण म्हणजे यामध्ये किरण माने यांनी ‘वसंत तात्या हृदय तुम्हाला, पण मत रवींद्र धंगेकरांना..’ असं म्हंटल आहे. रवींद्र धंगेकर हे पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. । Kiran Mane | Ravindra Dhangekar | Vasant More
किरण माने यांची संपूर्ण पोस्ट….
…बरेच दिवस यावर बोलायचे होते. बाकी काही का असेना वसंत मोरे या नेत्याची ही वृत्ती माझ्या मनाला भावली. आधी एक सांगतो…पुण्यातून रविंद्र धंगेकरच निवडून यावेत ही माझी इच्छा आहे. मला वेगळं बोलायचंय. कुठलाही नेता पक्ष सोडतो आणि दुसर्या पक्षात जातो… हे त्याचं संवैधानिक स्वातंत्र्य असतं. मतभेद होतात.
काही मजबुरी असते किंवा राजकीय स्वार्थही असतात… वेगळं व्हावं लागतं. पण हे करताना, पुर्वी आपण ज्या पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलाय… तिथल्या वरिष्ठांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला वेळोवेळी उमेदवारी दिली… अनेक महत्त्वाची पदं दिली… आपल्याला मोठं केलं… नांव दिलं… पैसा दिला… समृद्धी दिली… त्या वरीष्ठांशी राजकीय नातं तोडलं तरी माणसात ‘कृतज्ञता’ नांवाची एक गोष्ट असते… ती टिकवली तरच त्या नेत्याचे चारित्र्य दिसते. त्याच्यावरचे संस्कार दिसतात.
‘माणूस’ म्हणून तो विश्वासार्ह ठरतो. राजकारणी म्हणून नीतीवान सिद्ध होतो. जे नेते पक्ष सोडल्या-सोडल्या वरिष्ठांची निंदानालस्ती सुरू करतात… दोषारोप सुरू करतात… पुर्वी आपण ज्या नेत्यांच्या पाया पडत होतो… आदराने झुकत होतो… त्यांची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमानास्पद शब्दांत हेटाळणी करतात… ते खरंतर स्वत:ची लायकी दाखवतात. टीका करताना वयाचाही मान ठेवत नाहीत. आपल्यावर केलेल्या उपकारांची जाण ठेवत नाहीत. ‘माणूस’ म्हणूनही असे लोक नीच असतात.
राजकारणी म्हणून अत्यंत चारित्र्यहीन, निर्लज्ज असतात. ते कुणाचेच नसतात. ना स्वत:च्या कार्यकर्त्यांचे-ना जनतेचे. हल्ली अशा बेईमानी पिलावळीचा उच्छाद सुरू आहे राजकारणात. म्हणून या दलदलीत वसंत मोरेंसारखा राजकारणी लक्ष वेधून घेतो. मनाला भावतो. पक्ष सोडताना राज ठाकरेजींच्या फोटोला साष्टांग नमस्कार करून पक्ष सोडला. नंतरही दोषारोप नाहीत.
राज ठाकरेंनाही मी त्याबाबतीत मानतो. त्यांनीही कधी बाळासाहेबांची निंदा केली नाही. पवारसाहेबांना सोडून गेलेल्या सुशिलकुमार शिंदेंनीही कायम जाण ठेवली की मी जो आहे तो पवारसाहेबांनी मला राजकारणात आणलं म्हणून… किंवा विजयसिंह मोहिते पाटलांनी कधी पवारसाहेबांची पातळी सोडून नालस्ती केली नाही. याला म्हणतात राजकारणातला ‘माणूस’.
वसंतराव मोरे, तुम्ही तोच माणूसकीचा आदर्श जपलात. हे पहा, आमचा पाठिंबा कायम धंगेकरांना राहील. ते ही तुमच्यासारखेच ‘माणूसपण’ जपणारे आणि म्हणूनच सर्वसामान्यांची जाण असणारे उमदे नेते आहेत. पण पक्ष सोडताना तुम्ही केलेल्या या आदर्श कृतीबद्बल सलाम वसंतराव… मनापासून सलाम.
– किरण माने.