राहुरी – तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये लग्नाचे आमिष दाखवून दोन मुलींना तरूणांनी पळून नेले. घटनेचे गांभीर्य पाहून राहुरी पोलिसांनी तातडीने या दोन तरूणांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. या तरणांना मुली पळून नेण्यासाठी मदत करणाऱ्यांना गजाआड करण्यात आले आहे.तसेच त्या मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पहिल्या घटनेत राहुरी तालुक्यातील पुर्व भागात एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या राहत्या घरातून पहाटे दोनच्या सुमारास फारूक हारूण शेख या तरुणाने फूस लावून पळवून नेले होते. पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, पो. कॉ. प्रदिप ढाकणे, पो. कॉ. रवींद्र कांबळे, पो. ह. अशोक शिंदे आदिंच्या पथकाने अहमदनगर, पुणे, पंढरपूर, सातारा आदि परिसरात या जोडप्यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही.
पोलीस रात्रीचा दिवस करत वेगवेगळ्या माध्यमातून शोध घेतच होते.तोच गुरुवारी रात्रीच्या दरम्यान जिल्ह्यातील अकोले बसस्थानक परिसरात हे जोडपे तेथील मनसे कार्यकर्त्यांना संशयितरित्या फिरताना आढळले. त्यांची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
कार्यकर्त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून त्यांना पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर कायदेशीर बाबी पूर्ण करीत अल्पवयीन मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेतील फारुक हारून शेख (वय 22) याच्यासह त्याला मदत करणाऱ्या तीन साथीदारांविरुद्ध अपहरण तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत दोन समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता झाली होती. मात्र पोलिसांनी दक्षता घेत प्रकरण व्यवस्थित हाताळले. कुठेही कायदा सव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही.
दुसऱ्या घटनेत सादीक सलिम शेख (वय 22) या तरूणाने हळद लागलेली नवरीच लग्नाच्या पहाटेच मंगल कार्यालयातून पळून नेली. सदर प्रकार उघडकीस येताच लग्नाचे वऱ्हाड पोलीस ठाणे आवारात धडकले. सुमारे पाचशेहून अधिक जमाव पोलीस ठाण्यात जमला होता. त्यानंतर तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती काही पोलीस हाताळत होते. तेच दुसरीकडे पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील, चालक लक्ष्मण बोडखे, सुशांत दिवटे आदींचे पथक या पळून जाणाऱ्या जोडप्यांचा शोध घेत होते.
पारनेर तालुक्यातील टाकळी येथील एका हॉस्पिटलमध्ये या तरुणीला लपवून ठेवत हा तरूण फरार झाला होता. मात्र मोबाईल लोकेशनवरून काही तासातच पोलीस तेथे पोहचले. त्या तरुणीसह आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर तरूणीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. व आरोपी सादिक शेख याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यास बेड्या ठोकण्यात आल्या आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील करत आहेत.
पालकांनो आपल्या मुला-मुलींशी मैत्री करा, त्यांच्याशी चांगला सुसंवाद ठेवा, त्यांचे मित्र- मैत्रिणी तपासा, मोबाईल वापरत असेल तर त्याचे होणारे दुष्परिणाम मुलांना सांगत चला, मुलांचे अधूनमधून मोबाईल तपासा, मुलांवर चांगले संस्कार करून दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा त्यांना सांभाळा आणि मुला-मुलींनी देखील चुकीच्या ठिकाणी मित्र-मैत्रिणी करू नका. शिक्षणाकडे लक्ष देऊन चांगल्या नोकरीचे उद्दिष्ट ठेवा. नुकसान होईल,असे कुठल्याही आई-वडिलांना वाटत नाही म्हणून विवाहाचा निर्णय हा आई-वडिलांशी चर्चा करूनच घ्यावा. समाजात आपल्या आई- वडीलांची मान खाली जाईल, असे कुठलेच कृत्य करू नका आणि जर काही अडचण आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.
– मेघश्याम डांगे, (पोलीस निरीक्षक)