मुंबई -भारतात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल होणाऱ्या पाकिस्तानचे सामने कुठे होणार, हा प्रश्न निर्माण होत होता. मात्र, आता त्यांचे सामने गुजरातमधील अहमदाबादमध्येच होणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
1992 सालापासून प्रत्येक विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत व पाकिस्तान यांच्यातील सामने चाहत्यांसाठी पर्वणी ठरलेले आहेत. मात्र, जागतिक दबावामुळे पाकिस्तानने भूमिका बदलली व भारत सरकारनेही पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्यास तयारी दर्शवल्यामुळे त्यांचा संघ आता भारतात येणार आहे. मात्र, मुंबई वगळता त्यांचे सामने भारतात कुठे होणार, हा प्रश्न निर्माण झाला होता.\
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. हे जगातील सर्वात मोठे प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडियम आहे.
एक लाख प्रेक्षकांना सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. या स्पर्धेत एकूण 48 सामने होणार असून, बाद फेरीच्या तीन फेऱ्या होणार आहेत. संपूर्ण स्पर्धा 46 दिवस चालणार आहे. भारतातील सात ठिकाणी साखळी फेरीचे सामने होतील.