सातारा -सभासद शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चतम दर देऊन त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे कै. अभयसिंहराजे भोसले यांचे स्वप्न अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून खऱ्या अर्थाने साकार होत आहे. गाळपास आलेल्या उसाचे एफआरपीनुसार वेळेत पेमेंट अदा केले जात आहे.
सभासद शेतकऱ्यांच्या हक्काची संस्था असलेला हा कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम असून कारखाना शेतकरी हित जोपासण्यात नेहमीच अग्रेसर राहील, अशी ग्वाही कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. साखर उताऱ्याचा 35 वर्षांचा इतिहास पाहता या गळीत हंगामात सर्व उच्चांक मोडून कारखान्याने 12. 85 टक्के साखर उताऱ्याने साखर उत्पादन करून साखर उताऱ्यात नवीन विक्रम प्राप्त केल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या 36 वा गळीत हंगाम आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अध्यक्ष सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष विश्वास शेडगे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक संजीव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. गळीत हंगामाची सांगता आमदार भोसले यांच्या उपस्थितीत शेवटच्या पाच पोत्यांचे पूजन करून झाली. यावेळी ते बोलत होते. करोनाच्या महाभयंकर परिस्थितीतही ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेतील मुकादम, मजूर यांनी न घाबरता सक्षमपणे काम करून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांचेच आभार मानले.
या गळीत हंगामात 155 दिवसात 6 लाख 12 हजार 917. 029 मे. टन उसाचे गाळप होऊन विक्रमी 12.85 टक्के साखर उताऱ्याने 7 लाख 70 हजार 450 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. यातील एक लाख 750 क्विंटल साखर परदेशात निर्यात करण्यात आली. बी- हेवी मोलॅसिसपासून 20 लाख लिटर्स इथेनॉल निर्मिती करून भारत पेट्रोलियम व इंडियन ऑइल या कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला. हंगामात सरासरी 158.39 टक्के क्षमतेचा वापर होऊन प्रतिदिन 3990.78 मे. टन सरासरीने ऊस गाळप करण्यात आले.
या हंगामात शासन निर्धारित सूत्रानुसार 2790 रुपये प्रतिटन एफआरपी निघाली असून गाळपास आलेल्या उसाला पहिली उचल म्हणून 2500 रुपये प्रतिटनप्रमाणे पेमेंट वेळेत अदा करण्यात आले आहे. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना दिलासा मिळावा तसेच सोसायटी, बॅंक कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड सोसावा लागू नये यासाठी संचालक मंडळाने हिताचा निर्णय घेऊन उसाचे 10 दिवसांप्रमाणे पेमेंट अदा केले असून दर दहा दिवसांचे पेमेंट अदा करणारा अजिंक्यतारा हा महाराष्ट्रातील एकमेव कारखाना ठरला आहे. करोनाच्या संकटात अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन करून 31 मार्चपर्यंत गाळपास आलेल्या उसाला 150 रुपये प्रतिटन याप्रमाणे दुसरा हप्ता देऊन आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. एफआरपीप्रमाणे उर्वरित रक्कमसुद्धा लवकरच अदा करण्यात येईल, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.