एम. एस. सुतार
बावडा – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोणत्याही पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी अजून उमेदवारी अर्ज भरले नाहीत. तरी देखील जे उमेदवार रिंगणात उतरतील, ते विकासाच्या मुद्द्यांपेक्षा एकमेकांवर दोषारोप करीत एकमेकांचे पाढेच वाचून दाखवणार आहेत. विकासाचे काय? हा प्रश्न अनुत्तरितच राहणार की काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या पंचवीस वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील विधानसभा व इतर छोट्या मोठ्या सर्वच निवडणुकांत खूपच बदल झालेला दिसत आहे. पूर्वी फक्त विकासाचे मुद्दे निवडणुकीत गाजत होते. याकडे फारसे कोणी लक्ष देत नव्हते. परंतु सध्या तालुक्यातून विकासाचा मुद्दाच बाजूला पडला आहे. तो जाणीवपूर्वक बाजूला टाकल्याचीच जाणीव सूज्ञ मतदारांना होत नाही. गेल्या 50 वर्षांपासून 22 गावांच्या पाण्याचा प्रश्न लोंबकळला आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत पाण्याचे राजकारण होते. हा मुद्दा प्रत्येक उमेदवार आपापल्या सोयीनुसार जनतेसमोर चवीने चघळताना दिसतात. पूर्वीच्या लोकप्रतिनिधीने पाणी आणले नाही म्हणून मला निवडून द्या. पण नवा लोकप्रतिनिधी नंतर हे सगळं विसरून जातो. पुन्हा बावीस गावांच्या लोकांच्या पदरी निराशाच पडते. सहा वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेले. भविष्यात योग्य पावले उचलून योग्य नियोजन करण्याची मानसिकता राज्यकर्त्यांना आवश्यक आहे.
इंदापूरची जनता कंटाळली
कोणीही निवडणूक रिंगणात उतरा पण तालुक्याचा विकास करा, अशी आर्त हाक जनतेमधून उमटत आहे. इंदापूर तालुक्यातील जनता आता फसव्या राजकारणाला कंटाळली आहे. कारण लोकप्रतिनिधींच्या खुर्चीवर बसल्यानंतर प्रत्येकजण आपण दिलेल्या आश्वासनांना सोयीस्कररित्या बगल देतात. हाचा तालुक्याचा इतिहास आहे. त्यामुळे यावेळी तरी इतिहास बदलेल का, अशी भोळीभाबडी आस मतदारांना लागली आहे.
तरूणांचे भवितव्य अधांतरी
पाण्याबरोबरच तालुक्यात हजारो तरुण उच्चशिक्षण घेऊन आज बेरोजगारीचे बळी ठरले आहेत. या तरुणांच्या हाताला रोजगार नाही, नोकरी तर नाहीच पण व्यवसाय करावा तर आधीच शिक्षणाला लाखो रुपये खर्च आलेला असतो यात व्यवसायासाठी लाखो रुपये आणणार कुठून. जरी एखाद्याने त्यातूनच कर्ज काढून व्यवसाय सुरू केला तर पाण्याअभावी व्यवसाय चालत नाही. मग करायचं तरी काय, हा प्रश्न तरुणांना भेडसावत आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्राधिकरणात शेकडो हेक्टर जमीन अजूनही पडिक आहे. एमआयडीसीमध्ये कंपन्यांना आमंत्रित करून तरुणांना रोजगारवाटा उपलब्ध केल्या नाहीत. इंदापूरशेजारी दौंड व बारामती तालुक्यातील एमआयडीसी पंचतारांकित आहेत. तिथे अनेक कंपन्यांमातून तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मग इंदापूरमध्ये का होऊ शकत नाही, हा प्रश्न आहे. निवडणुकीत असे मुद्दे जाणीवपूर्वक टाळून फक्त एकमेकांवर दोषारोप करायचे, हाच उद्योग सुरू आहे. भावनिक मुलामा देऊन जनतेला येड्यात काढण्याचा प्रकार सुरू आहे.