नवी दिल्ली : भारताच्या नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आणि इतिहास रचला! भारतासाठी हा मोठा सुवर्णक्षण ठरला. दरम्यान, याच अभूतपूर्व कामगिरीच्यानिमित्ताने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचे वडील सतीश कुमार आपल्या मुलाच्या यशाने भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.आपल्या मुलाच्या सुवर्ण कामगिरीविषयी त्यांच्या वडिलांनि पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते खूप भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
आपल्या मुलाच्या विजयाबद्दल बोलताना सतीश कुमार म्हणाले कि, “मला माझा आनंद शब्दात व्यक्त करता येणं कठीण आहे. मी अत्यंत आनंदी आहे कारण माझ्या मुलाच्या प्रयत्नांमुळे, यशामुळे आपल्या देशाचं स्वप्न पूर्ण झालं आहे.” सतीश कुमार यावेळी एएनआयशी बोलत होते.
“आम्ही एका शेतकरी कुटुंबातून येतो. एका शेतकऱ्याला स्वतःच्या इच्छेनुसार कधीच भरभरून जगायला मिळत नाही. परंतु, माझा असा विश्वास आहे की ज्या कुटुंबांना मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागला, त्या कुटुंबांना त्याचं नेमकं महत्त्व समजलं आहे. त्यांच्यात आपलं स्वप्नं जगण्याचं आणि काहीतरी साध्य करण्याचं धैर्य आहे”, अशा शब्दांत सतीश कुमार यांनी विश्वास व्यक्त केला.
Father of Olympic medalist Neeraj Chopra expresses happiness on son’s Gold medal, says country’s dream fulfilled
Read @ANI Story | https://t.co/Kdq2qkaXds#NeerajChopra #Tokyo2020 pic.twitter.com/ijLdk3xqwK
— ANI Digital (@ani_digital) August 7, 2021
ह्या सगळ्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं असलेलं महत्त्वही सांगताना यावेळी ते म्हणाले कि, “जोपर्यंत आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकणार नाही. नीरजनेही तेच केले.”
नीरज चोप्राने देशाला दिलेल्या या सुवर्णक्षणांमुळे अत्यंत भारावलेले सतीश कुमार पुढे म्हणाले कि, “आमचं चार भावांचं कुटुंब आहे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकानेच नीरजला सर्वोत्तम भालाफेकपटू बनण्यासाठी योग्य मार्गदर्शन कसं मिळेल याची खात्री केली होती. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वांनी त्याला साथ दिली.
इतकंच काय तर आमच्या संपूर्ण गावाने त्याच्या यशासाठी प्रार्थना केली होती. आम्हाला सुरुवातीपासूनच विश्वास होता कि, आमच्या मुलामध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची क्षमता आहे. पण आता त्याने ते सिद्ध करून दाखवलं आहे”, हे बोलताना सतीश कुमार यांना आपले अश्रू अनावर झाले.