पुणे – भारतीय संस्कृतीने व अध्यात्माने संपूर्ण जगावर राज्य केले आहे. त्यामुळे आजच्या काळात वसाहतवादी मानसिकतेला छेद देण्याची गरज आहे. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने याला चळवळीचे रूप देऊन कौतुकास्पद कार्य करीत असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग)तर्फे “वसाहतवादी मानसिकता बदलणे’ या विषयावर कोथरूड येथील कॅम्पसमध्ये आयोजित पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरहदचे संस्थापक संजय नहार, संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल कराड, पत्रकार लक्ष्मीकांत जोशी, डॉ. संजय उपाध्ये, कुलगुरू डॉ. एन. टी. राव, प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि मिटसॉगच्या सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय संस्कृती आणि परंपरेला देशात पुन्हा मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी हा विषय केंद्रात प्रखरतेने मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. लोकांच्या जीवनव्यवहाराचा विषय व्हावा, यासाठी राहुल कराड यांनी सुरू केलेली ही चळवळ देशात नक्कीच परिवर्तन घडवून आणेल.
प्रा. राहुल कराड म्हणाले, ब्रिटिशांच्या विचारधारेला कुठे तरी छेद देण्याचे कार्य आधुनिक काळात होणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भारतीय संस्कृती व परंपरेच्या विचारधारेचे बिजे पेरणे गरजेचे आहे. संस्थेचे शिक्षक हे विद्यार्थ्यांसमोर हा विषय मांडून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील. भविष्यात हीच विचारधारा एक मोठी चळवळ होईल.