अरुण गोखले
लोभीराम नावाचा सावकार, त्याच्या नावाप्रमाणेच अत्यंत लोभी होता. तो कधी गोड बोलून, मोठ्या चातुर्याने अडाणी लोकांना हातोहात फसवत असे. हिशेबांच्या कागदात खाडाखोड करणे हा तर त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. त्याने आतापर्यंत अनेक लोकांना फसवले होते.
दिलेल्या रकमेची वसुली करताना तो फार कठोरपणे वागत असे. कर्जाच्या रकमेच्या बदल्यात तो त्यांच्या जमिनी, घरदार, शेतीवाडी लिहून घेत असे. कोणी जर रक्कम परत फेडू शकले नाही तर तो त्यांच्या चीजवस्तू उचलून आणत असे. प्रसंगी कुणाला मारहाणही करीत असे. कुणाचे दागदागिना हिसकावून घेत असे. तो लोकांशी अगदी निर्दयपणे वागत असे.
त्यामुळे लोकांच्या मनात लोभीरामाबद्दल आदर नव्हता, प्रेम नव्हते, पण गरजेच्यावेळी उपयोगी पडायचा म्हणून काय तेवढा लोक त्याला रामराम करीत इतकेच. पण मनापासून मात्र तो कोणालाच आवडत नव्हता. त्याचे हे सारे खोटे आणि कागदावरील खाडाखोडीचे प्रकार रात्रीच्या अंधारात आणि तेही केवळ एका मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात चालत.
एक दिवस काय झाले, लोभीराम अशाच काही नोंदी कर्जदारांच्या खातेवहीत करत होता. मध्यरात्र उलटून गेली होती, तरी त्याचे काळे काम चालूच होते. बरीच रात्र झाल्याने डोळ्यांवरची झोप अनावर होत होती. पण त्याला उद्या गावात वसुलीला जायचे होते म्हणून तो ती डोळेफोड करत होता.
लिखापढीचं ते काळं काम मध्यरात्रीच्या अंधारात करत असताना लोभीरामाला कधी पेंग आली ते त्याचं त्यालाच कळलं नाही. त्याने तिथेच हातपाय पसरले आणि झोपी गेला. झोपेत नकळत त्याचा धक्का दिव्याला लागला. दिवा वहीवर पडला. दिव्याच्या ज्योतीने वहीचे कागद भराभर पेटू लागले. मोठा जाळ झाला. धग लागली तेव्हा लोभीरामला जाग आली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्याच्या लबाडीची पार राखरांगोळी झाली होती.
आता लोभीरामाला काहीच करता येणार नव्हते. कारण त्याच्या जवळचा लेखी पुरावाच जळून त्याची राख झाली होती. त्याच्या खोटेपणाची त्याला मोठी शिक्षा त्याच्या कर्माने दिली होती. आता केवळ पस्तावा करण्याशिवाय त्याच्या हातात काहीच राहिले नव्हते.