माझी एक मैत्रीण होती… मैत्रीण म्हणण्यापेक्षा अभियांत्रिकी महाविद्यालयातली सहपाठी म्हणणं जास्त चांगलं लागू पडेल! तर ती मुलगी जाता-येता काय मग “प्रज्ञा कुलकर्नी’? असं विचारून मला भंडावून सोडे…! कदाचित तिला माझं मराठी आणि त्यातल्या त्यात शुद्ध आणि सात्त्विक मराठी प्रेम माहिती असावं! कुलकर्णी मधल्या “ण’ चा “न’ झाला की माझं डोकं खरंच गरगरायला लागतं!
अभियांत्रिकी शिकत असताना खऱ्या अर्थानं माझी जिवलग मैत्रीण असणारी शलाका मात्र माझ्यातल्या “शुद्ध मराठीप्रेम’ या प्रकाराला घाबरून असायची!
चारचौघांत बोलताना कोणी व्याकरणदृष्ट्या चुकीच्या पद्धतीनं वापरलेली वाक्यं किंवा अशुद्ध… थोडक्यात, अपभ्रंशीत शब्द लक्षात आले की शलाका पापण्यांची पिटपिट करत बावरलेल्या अवस्थेत माझ्याकडे दृष्टी फेके… इथल्या कोणाच्याही भाषिक-सांस्कृतिक प्रगतीची धुरा तुझ्या खांद्यावर नाही… तरी कृपया ताबडतोब शाब्दिक/भाषिक सुधारणा सुचवून समोरच्या व्यक्तीचा शेलका अपमान करणे टाळावे! असं सुचवायचं असे तिला.
अभियांत्रिकी उत्तीर्ण होऊन जवळजवळ सहा वर्षे झाली, पण शलाकाच्या डोळ्यातले ते भाव माझ्या डोळ्यांसमोर अजूनही तसेच आहेत. आता मी कोणाला भाषिक सुधारणा सुचवत नाही. …सहसा हं!
पण एकूणच भाषेवरून माणसाचा, त्याच्या सुसंस्कृतपणाचा अंदाज घेण्याची अनेकांची जुनी सवय अनेकांना चिकटून राहते. पुढे पुढे सरकत राहते. अगदी तोपर्यंत जोपर्यंत भाषेचा बाह्यलहेजा नाही तर काळजातली माया-प्रेम तंतोतंत चितारणाऱ्या भाषेतल्या कुठल्याही लहेज्यातला गोडवा कळत नाही तोपर्यंत.
त्यावरूनच आठवलं! माझ्या मुलाला दिवसभर सांभाळण्यासाठी एखाद्या मावशीच्या शोधात होते मी, तेव्हाचा हा अनुभव.
काही घरगुती अडचणी होत्या. मला रजा नव्हतीच. अगदी ताबडतोब बाळाला सांभाळणाऱ्या मावशीची निकड होती. चार-पाच ठिकाणी सांगून-सवरून, दोन-चार ठिकाणी फोनाफोनी करून चौकशी केली. दोघीतिघीजणी कामासाठी गरजू होत्या. त्या भेटायला आल्या. योगायोगानं एकाच संध्याकाळी दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरात त्या माझ्या घरी पोचल्या. त्यापैकी एक तरणीताठी.
नव्या जमान्याची. नव्या पद्धतीची छान साडी नेसून नीटनेटकी आलेली. बऱ्यापैकी शुद्ध आणि स्वच्छ मराठी बोलणारी. दुसरी थोडीशी मध्यमवयीन आणि अबोल. तिची भाषा आणि स्वभाव कळण्याइतकं बोललीच नाही ती आणि तिसरी जेष्ठत्वाकडे झुकणारी. जुनीच साडी होती अंगावर. राहणीमानही बरंच म्हणावं लागेल. पाहताक्षणी छाप पडण्यासारखं काहीच नाही. गावबोलीत गप्पा चालू होत्या तिच्या माझ्या घरच्यांशी. तिच्या भाषेवरून तिचं गाव एव्हाना समजलंच होतं. विचारायची गरजच पडली नाही.
मनोमन मी पहिलीची निवड करून मोकळी झाले. तिघी एकत्रच निघतील तेव्हा पहिलीला सांगून टाकायचं की, उद्यापासून तू कामावर ये. दुसरी तर पसंत पडली नाहीच आणि तिसरीच्या सानिध्यात आपल्या पोराच्या भाषेच्या चकल्या पडायच्या, ही काळजी. नकोच ते. पहिलीच बरी.
मी पहिलीशी संवाद वाढवला. पण तिसरीशी संवाद वाढवायची गरजच पडली नाही. आल्यापासून तिचा इतरांशी आणि बाळाशी चालू असलेला संवाद थांबला तर मी तो वाढवणार ना. तो अखंड चालूच होता. चहापाणी झालं. त्या तिघी निघणार इतक्यात इतका वेळ आळीपाळीने त्या तिघींकडे टकाटका बघत निवांत पहुडलेल्या आमच्या राजकुमारानं त्याचा ठरलेला कार्यक्रम उरकून घेतला.
निरोप घेऊन व्यावसायिकपणे बाहेर पडू पाहणाऱ्या त्या दोघी उंबऱ्यापलीकडून पाहू लागल्या पण तिसरी मात्र चपळाईनं आणि आपलेपणानं माघारी फिरली. लेकरानं लंगोट रंगिवला वं! …उटा उटा…लंगोट बदला! लई मोठ्ठा चित्रकार होनार तू जनू …त्या मावशीनं स्वच्छ-अस्वच्छतेच्या जाणीवांच्या पुढे जाऊन मायेनं त्याचं लंगोट बदललं.
मावशीचं अगत्य तिच्या शब्दांतून आणि मुख्य म्हणजे तिच्या प्रांजळ कृतींतून थबथबत होतं. काहीवेळा चुकलेले निर्णय बदलण्याची संधी नियतीच आपल्याला देऊ करते. मग काय! मी काही निर्णय देण्यापूर्वीच नवऱ्याने त्यांना दुसऱ्या दिवशीची वेळ सांगितली. शुद्ध आणि अशुद्धापेक्षा मायेच्या गोडव्याची भाषा जिंकली.
दुसऱ्या दिवसापासून आजतागायत मावशींच्या भाषेतली बडबडगीतं आमच्या घरी अगदी दुमदुमतात.
बाळ करतंया तो तो तो,
बाळाची बायको यो यो यो!
बाळ करतंया गर्दा,
लंगोट बदला चारदा!
हे गाणं बऱ्याचदा असतंच… पण अजूनही अनेक जुनी-पुराणी गाणी तिच्यावर प्रादेशिक भाषिक संस्कार करून आमच्या कानांवर येतात.
अंगडं-टोपडं,
शिव शिंपीणी जरीचं,
ल्येकरू हे थोराचं,
तान्हं बाळं!
मावशींची ही असली गाणी लोकगीतं आहेत की त्यांची स्वरचित यावर मी अजूनही साशंक आहे. मी विचारतेही त्यांना बऱ्याचदा तर म्हणतात…तुमाल न्हाई कळनार… लेकरास्नी रमवाया शुद्ध भाषा नाई, मायेची भाषा लागती. त्याच मायेच्या भाषेतलं हे गाणं.
त्यांची उत्तरं आणि त्यांची भाषा यातलं काही मला पटावं म्हणून त्या प्रयत्न करत नाहीत. मीही व्याकरण आणि वृत्त, संधी सोडून दिल्याहेत या बाबतीत. पण जे आहे ते फक्त आणि फक्त गोड आहे.
मालवणी असो, खानदेशी असो, वऱ्हाडी असो वा घाटी शेवटी ती मराठी. मराठी म्हणजे साखरेच्या गाठी. कशाही खा आणि कशासोबतही खा. त्या गोडच! तो गोडवा आकाररहित असतो. काळजातल्या कुठल्याही भावनेचं रूप घेणं आपल्या मराठीला सहज जमतं. कवी, गायक, वकील, अभिलेखाकार, वक्ता. साऱ्यांना पुरून उरते आपली मराठी. मैलामैलावर बदलत जाणाऱ्या प्रांतांनी देऊ केलेले प्रादेशिक शब्दांचे खानदानी अलंकार मिरवून एखाद्या सालंकृत रूपगर्वितेसारखी तुमच्या, आमच्या, साऱ्यांच्या ओठी तितक्याच माधुर्यानं खळाळते.
तिचा सत्कारदिन साजरा व्हायलाच हवा. मराठी बोला. मराठी वाचा आणि मराठीवर प्रेम करा.
– प्रज्ञा जोशी-कुलकर्णी