पुणे – विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, त्याचे पडसाद पक्षात उमटणे स्वाभाविक होते आणि तसे घडलेच. कोल्हापूरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचाच राजीनामा मागितला. पक्षांतर्गत कटकटी सुरू झाल्या असतानाच भाजपचे आमदार फुटणार असे इशारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिले. भाजपपुढे आव्हानच उभे राहिले आहे.
येत्या वर्ष दीड वर्षात ग्रामपंचायतींपासून महापालिकापर्यंतच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील सत्ता हाती नसताना भाजपला याला सामोरे जायचे आहे. त्यामुळे आव्हाने पेलताना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजकीय कसरती कराव्या लागणार आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभवाचे कारण देऊन भाजपच्या कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागितला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात कोल्हापूरचा समावेश होतो आणि चंद्रकांत पाटील यांचे कोल्हापूर मूळगाव आहे. त्यामुळे पाटील यांना बचावात्मकच पवित्रा घ्यावा लागेल. तसेच पक्षातीलच विरोधक या परिस्थितीचा फायदा उठवू पाहतात. त्यामुळे राजीनामा मागणीचे लोण इतरत्र पसरू नये याचीही दक्षता घ्यावी लागेल.
विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन संपले आणि लगेचच भाजपचे आमदार फुटणार का? याची चर्चा सुरू झाली. दहा आमदार भाजपचा राजीनामा देतील असेही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते सांगू लागले. भाजपमधून फुटून आमदार राष्ट्रवादीत जातील, त्यांनी आमदारकीचे राजीनामे दिले की महाविकास आघाडी त्यांना निवडून आणेल अशी गणिते मांडली आहेत. हे सर्व राष्ट्रवादीच्या गोटातून चालले आहे, यावर कॉंग्रेसची प्रतिक्रिया समजलेली नाही.
आघाडी सरकार पडणार असे गेले वर्षभर म्हटले जात होते, सरकार काही पडले नाही. आता भाजप फुटणार असे म्हटले जाऊ लागले आहे. राज्यातील जनमत आणि काही घडामोडी पाहता भाजपला इशारा गंभीर आहे. गाफील राहून चालणारे नाही. माजी खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर अशा चर्चा सुरू आहेत. भाजपचे काही नगरसेवक काकडे यांचे पाठिराखे आहेत. पुण्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे भाजपच्या नेत्याने सांगितले. याचा अर्थ भाजपनेही पर्यायी योजना तयार केली आहे.