– सचिन सातव (गटनेते, नगरपरिषद बारामती.)
शब्दांकन : प्रमोद ठोंबरे, (बारामती तालुका प्रतिनिधी)
राजकारणात कार्यरत असताना स्वकियातील हितशत्रू हे विरोधकांपेक्षा घातक असतात. विरोधक हे समोरून लढाई करतात. मात्र, स्वकियांतील हितशत्रू हे जवळच राहून राजकीय कुरघोड्या करण्यात माहिर असतात. याचा अनुभव सर्वांना येत असतो. आदरणीय पवार साहेब यांना वयाच्या तिशीच्या कालावधीत येत होता. यात विरोधकांना शांतचित्ताने नामोहरम करण्यात पवार साहेब हे तरबेज ठरले आहेत.
राजकारणात प्रवाहाच्या बाजूने आणि प्रवाहाविरोधात पोहणारे आणि प्रयोगशीलता, नावीन्यता जोपासणारे साहेब हे धाडसी निर्णय घेतात. साहेब हे राजकीय वाऱ्याची दिशा आणि बदलते स्वरूप, आगामी रणनीती यावर विचारमंथन करतात. त्यामुळे त्यांचे निर्णय हे भविष्यकाळातील घडणाऱ्या घडामोडीशी सुसंगत असतात. याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राला आली आहे.
आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत साहेबांनी अपराजित योद्धा म्हणून ओळख निर्माण केली आहे. यामागे त्यांची दूरदृष्टी आहे. यात भविष्याचा वेध घेतल्याने त्यांची निर्णयक्षमता आजही राजकारणासाठी दिशादर्शक ठरत आहे. राजकारणातील चढ- उतार, तर कधी हेलकावे खावे लागते. मात्र, त्यावेळी स्थितप्रज्ञ राहून वाटचाल करणे, हे अनेकांना शक्य होत नाही. मात्र, साहेब हे राजकारणातील डावपेच, गनिमी काव्याला पुरून उरले आहेत. यात मातब्बर, प्रस्थापित गारद झाले. कधी साहेबांच्या वाट्याला गेले नाहीत. इतका दबदबा त्यांनी राज्याच्या राजकीय पटलावर निर्माण करून ठेवला आहे.
साहेब, हे राजकारणातील बारकावे टिपणारे आणि सद्यस्थितील राजकीय वाऱ्याची दिशा, भविष्यातील बदलती दिशा कोणत्या बाजूने वाहत आहे, हे अचूक हेरतात. सर्व क्षेत्रात चौफेर ज्ञानार्जन करणारे साहेब हे एकमेवद्वितीय आहेत. राज्याच्या राजकारणात काम करताना त्यांनी आपल्या राजकीय क्षेत्रात विरोधकांना चितपट केले आहे. यामध्ये 1995 मधील विधानसभेची निवडणूक होय.
पुढील पाच वर्षांत राजकारणाचे वारे हे कशा पद्धतीने बदलणार आहे, याचा हवामान खात्याप्रमाणे अचूक अंदाज वर्तविणारे साहेब आहेत. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्याने साहेबांना गावगाड्यापासून शहरापर्यंतची नस् अन् नस् माहीत आहे. त्यांची अर्थकारण, उद्योग, सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील चौफेर भ्रमंती महाराष्ट्रासाठी सर्वसमावेशक, आश्वासक आहे. राजकीय क्षेत्रात अपराजित योद्धा म्हणून त्यांनी आतापर्यंत वाटचाल केली आहे. आपल्या पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण, अशी शिकवण दिली आहे. त्यांच्या तत्वानुसार आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत. लोककल्याणकारी योजना, कामे तळागाळात पोहोचविण्यासाठी त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना कानमंत्र दिला आहे. हीच शिदोरी राष्ट्रवादीसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
सत्ता असो वा नसो मात्र, लोकवलयाचा लंबक हा कायम शरद पवार साहेब यांच्याभोवती फिरता राहिला आहे. सत्तेच्या परीघाबाहेर असताना साहेबांकडे प्रश्नांची तड लावण्यासाठी अनेकजण येतात. यावेळी साहेब समस्यांतून त्यांना मार्ग काढून देतात. उत्तम प्रशासक, लोकाभिमुख, विकासाभिमुख ध्यास घेऊन आजही साहेब महाराष्ट्राचा व्यापक विचार करतात. त्यामुळे साहेब हे आजही अपराजित योद्धा म्हणून ओळखले जातात.
2014 पासून राज्यासह देशासह राजकारणातील मुल्ये घसरत आहेत. या परिस्थितीत विरोधी विचारधारा रूजली जात आहे. राज्यात 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सत्तेच्या परीघाबाहेरच होता. त्यावेळी विरोधकांनी राष्ट्रवादीच्या बिनीच्या शिलेदारांना दबावतंत्राचा वापर करीत आपल्या पक्षात ओढले. शिलेदार, कार्यकर्ते नाईलाजास्तव विरोधी गटात सामील होऊ लागले. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी घेण्यासाठी ज्येष्ठ, अनुभव उमेदवारीची उणीव भासू लागली. त्यावेळी तरूणांना संधी मिळाली. त्याचवेळी साहेब हे राष्ट्रवादी पक्षांसाठी संकटमोचक म्हणून धावून आले. यात निवडणूक प्रचारात त्यांची वरूणराजाशी झालेली भेट ही संपूर्ण महाराष्ट्राला भावली. 80 वर्षांचा योद्धा विरोधकांशी प्रखर लढा देत आहे, याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्रातील सूज्ञ नागरिकांना झाली. त्यानंतर भरपावसातील प्रचारसभा ही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून श्रेय हे पवार साहेब यांच्याकडे जाते.
दोन पक्षांची समान विचारधारा आणि एका पक्षांची विरोधी विचारधारा असताना त्यांनी 2019 मध्ये महाविकास आघाडी राज्याच्या सत्तेत अस्तित्वात आणली. आणि आज गेली दोन वर्षे त्यावर नियंत्रण ठेवले आहे. हे किमया फक्त पवार साहेबच करू शकतात. गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडीसमोर विरोधकांनी अनेक संकटे आणली. महाविकास आघाडी खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही तेच कारस्थाने सुरू आहेत. मात्र, साहेब हे यातून मार्ग काढीत तीन घटक पक्षीयांना आधार देत आहेत. आज साहेबांच्या भरभक्कम पाठबळावर राज्यात महाविकास आघाडी कार्यरत आहे.
आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत राज्यावर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर आजही साहेब हे धावून जातात. सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेतात. करोना, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीतील शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रशासकीय पातळीवर त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाची शिदोरी युवा पदाधिकारी, मंत्री आदींना पूरक ठरत आहे.
शरद पवार साहेबांचं अष्टपैलू, सामर्थ्यवान, सर्वसमावेशक, युवकांचे प्रेरणादायी नेतृत्व महाराष्ट्रसाठी रोल मॉडेल आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुरोगामी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांपासून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून मंगलमय शुभेच्छा…