विठ्ठल मणियार (ज्येष्ठ उद्योजक)
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, “स्वये श्री रामप्रभु ऐकती’, “उद्धवा अजब तुझे सरकार’, “बुगडी माझी सांडली गं’, “आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे’, अशी एकाहून एक गाणी साहेब भाषणातून ऐकवत होते. प्रसंग होता बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात उभारलेल्या सांस्कृतिक भवन उद्घाटनाचा. ज्येष्ठ कवी, साहित्यिक कै. ग. दि. माडगूळकरांचे नाव या भवनास देण्याच्या कार्यक्रमात साहेब भाषणात गदिमांचे गुणवैशिष्ट्यांचा ऊहापोह करीत असताना त्यांच्या अजरामर गीतांचा उल्लेख करीत होते.
बारामतीकरच नव्हे तर माडगूळकर कुटुंबीय, खास माडगूळहून आलेले गदिमांचे चाहते आचंबित होत होते. साहेब कलेचेही रसिक, जाण असलेले व्यक्तिमत्त्व असल्याचा सुखद अनुभव उपस्थित मंडळी घेत होती. शाळा-कॉलेजमध्ये असताना ऐकलेले, राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या गदिमांच्या व्यक्तिमत्त्वाचा साहेबांवर फार मोठा पगडा आहे. मूळतः रसिक मनाचे साहेब, गदिमा, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, पं. भीमसेन जोशी यांचेबरोबर गप्पांचे मैफिलीत रममाण झालेले मी पाहिलेत.
1998 च्या दरम्यान पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्रास भेट देण्याचा प्रसंग. केंद्रप्रमुख ज्येष्ठ कलाकार श्री. सतीश आळेकर माहिती देत होते. खेड्यापाड्यातून आलेले नवोदित कलाकार येथे कला-संगीताचे शिक्षण घेतात.
स्वतःची फीदेखील भरण्याची क्षमता अनेक विद्यार्थ्यांची नसते. साहेबांना याची जाणीव होती. प्रतिवर्षी 10 विद्यार्थ्यांची रु. 50 हजार एकूण फी विद्या प्रतिष्ठानमार्फत देण्याचे लगेचच जाहीर केले. त्यानुसार मुलांची फी दरवर्षी संस्थेमार्फत दिली जाऊ लागली. या संस्थेमधून तबला वादनाचे शिक्षण पूर्ण करून तबला शिकविण्याचे स्वतंत्र वर्ग घेत असलेला मूळचा लातूर जिल्ह्याच्या, एका खेड्यातील विद्यार्थी माधव पोस्ते मला भेटला. साहेबांच्या शिष्यवृत्तीमधून शिक्षण पूर्ण करून तो पुण्यात स्थिर झाल्याचे सांगत होता. शिकवणीचे उत्पन्नातून छोटं घरही झालं, लग्नही केलं, आनंदात आहे. कलाकारांना शिक्षण देत आहे, असे सांगत होता. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामधून साहेबांचे कला आणि कलाकारांविषयीचे प्रेम, आत्मियता दिसून येते.
“घाशीराम कोतवाल’सारखी कलाकृती परदेशात जाण्यास मनाई करणाऱ्या मंडळींच्या विरोधात, विरोधकांना चकवा देऊन कलाकारांना परदेशात पाठविण्याची यशस्वी योजना साहेबांनी राबविली हे सर्वश्रुत आहे. भारतीय कला परदेशात जावी, कलेचा प्रसार इतरही देशात व्हावा या उदात्त हेतूने साहेब मदत करीत असतात. ज्येष्ठ कवी श्री. ना. धों. महानोर यांच्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद साहेबांनी महानोरांचे गावी त्यांचे शेतात बसून घेतला आहे. महानोरांना आमदारही केले. कलावृद्धीसाठी ते प्रयत्नशील असतात. त्यासाठी केवळ प्रोत्साहन न देता सढळ हाताने मदत करण्यातही त्यांचा पुढाकार असतो.
राजकीय व्यक्तींना कलेचे अंग नसते, असा समज लता मंगेशकरांचाही होता. सोलापुरात लतादीदींचा नागरी सत्कार साहेबांच्या हस्ते होता, लतादीदींनी साहेब हे उत्तुंग व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगून त्यांना संगीताची केवळ गोडीच नव्हे, तर चांगले ज्ञान आणि जाणही असल्याचे नमूद केले. लतादीदींना भारत सरकारने “भारतरत्न’ने विभूषीत केल्यानंतर साहेबांनी त्यांच्या सत्कारानिमित्त दीदींच्या उपस्थितीत दिल्लीतील निवासस्थानी ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकरांचे गायन ठेवले. संध्याकाळची ही मैफल उपस्थितांना आजही स्मरणात आहे. डिसेंबर महिन्याचे लोकसभेचे अधिवेशनाचे काळात ज्येष्ठ गायकांचे गाण्यांचा कार्यक्रम साहेब निवासस्थानी आवर्जून करतात. या कार्यक्रमास अनेक खासदार, उद्योगपती, मित्रमंडळी उपस्थित असतात.
शैक्षणिक, साहित्यिक, क्रीडा, वैद्यकीय, कला आदी विविध क्षेत्रांतील गुणवंत, गरजू विद्यार्थी आणि व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यासाठी साहेबांनी स्थापलेल्या “पवार सार्वजनिक न्यासच्या वतीने बारामतीमध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला शारदोत्सव आयोजित केला जातो. पहिल्या शारदोत्सवाचे उद्घाटन भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते झाले होते. दरवर्षी होणाऱ्या या उत्सवात श्रीमती किशोरी आमोणकर, अश्विनी भिडे-देशपांडे, आरती आंकलीकर, मालिनी राजूरकर, राहुल देशपांडे, महेश काळे, आनंद भट, आनंद माडगूळकर, अशोक हांडे, उपेंद्र भट, रशित खान, शंकर महादेवन अशा अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे.
तसेच उल्हास कशाळकर, पंडित राजन-साजन मिश्रा, मंजुषा पाटील, देवकी पंडित, कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, कौशिकी चक्रवर्ती, मुकुल शिवपुत्रा, चैतन्य कुंटे आदी नवोदित कलाकारांच्या कलेचा आनंद ही बारामतीकरांनी घेतला. बारामतीसारख्या तालुक्याचे ठिकाणी देशात-परदेशात नावाजलेल्या कलावंतांच्या कलेचा आस्वाद बारामतीकर भरभरून घेत आहेत. त्यांचेमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी जाणवतेय. मी साहेबांना एकदा विचारले, ते म्हणाले बारामतीकर सर्व गोष्टीत निपुण आहेत. आता मला त्यांना “कानसेन’ घडवाचंय. समाजाची उंची लोकांच्या सांस्कृतिक उंचीवर अवलंबून असते, ती बारामतीकरांनी गाठली.
साहेबांना संगीत, नाटक विषयांची गोडी व ओढ मानसिक आनंद देणारे अमृत आहे. 60 वर्षे राजकारणात सतत व्यग्र साहेब गाडीप्रवासात शास्त्रीय गायनाच्या कॅसेट्स लावतात. भान विसरून तल्लीन होतात. संगीताच्या तालावर मांडीवर हाताच्या बोटाने ताल धरलेल्या साहेबांच्या चेहऱ्यावर तृप्ततेचे भाव उमटलेले दिसतात. ताजेतवाने होऊन साहेब पुन्हा कामाला लागतात तेव्हा ते “रसिकराज’ असतात.