राम ताकवले (माजी कुलगुरू)
शरद पवारसाहेबांनी शिक्षणात, विकासात कधीच राजकारण आणले नाही. संस्था उभारणी आणि चांगल्या व्यक्तींना संधी देणे हे त्यांचे कायमचे धोरण आहे. त्यांनी संस्था उभ्या केल्या त्या कर्तृत्ववान लोकांच्या हाती सोपवल्या. शिक्षणाचे संगणकीकरण करण्याचे अलौकिक काम केले.
मी शिक्षण क्षेत्रातील… राजकीय व्यक्तींशी माझा फारसा संपर्क नव्हता. 1978मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अध्यापन करत होतो. त्या वर्षी नव्या कुलगुरूंची निवड होणार होती. त्यासाठी तयार केलेले पॅनेल राज्यपालांनी रद्द केले. त्यामध्ये एम. आर. भिडे यांचे नाव होते. त्यावेळी ते कुलगुरू व्हावेत असे वाटणाऱ्यांपैकी मी एक होतो.
चांगली व्यक्ती, त्यांचा उत्साह, कामाच झपाटा यामुळे त्यांच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. आता पॅनेलच रद्द झाल्याने एम. आर. भिडे यांचे नाव मागे पडले. राज्यपालांनी नव्याने पॅनेल तयार करण्याचे आदेश दिले. त्यावेळी प्रा. देवदत्त दाभोलकर कुलगुरू होते. त्यांना पुढची टर्म मिळावी अशी सगळ्यांची इच्छा होती. पण त्यांचेही नाव पॅनेलमध्ये नव्हते. त्यावेळी भिडे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, मला तुझा बायोडाटा दे. तुझे नाव पॅनेलमध्ये आले पाहिजे. मी त्यावेळी 45 वर्षांचा होतो. मी त्यांना म्हणालो, अहो इथे एवढी मोठी माणसे असताना मी कशाला? त्यावर ते म्हणाले, तुला इथले राजकारण माहीत आहे. तू नाही बायोडाटा दिलास तर कुणीही येईल. त्या कुणाही पेक्षा तू चांगला आहेस.
आमची चर्चा झाली आणि मी त्यांना म्हणालो, काही माणसे येऊ नयेत म्हणून मी बायोडाटा देतो. सदानंद वर्दे शिक्षणमंत्री होते. भाई वैद्य मंत्रिमंडळात होते. शरद पवार मुख्यमंत्री होते. भाई वैद्य म्हणाले, राम ताकवले सेवादलाचा आहे. कुणी काही न करता त्याचे नाव आले असेल तर त्याची निवड का करू नये. एस. एम. जोशी आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक. त्यांनीही माझ्या नावाला पाठिंबा दिला होता. माझा कुठे वशिला नव्हता. केवळ गुणवत्तेच्या आधारे माझे नाव पॅनेलमध्ये आले होते. शरद पवारांची कायमची सवय म्हणजे सगळ्यांशी बोलून, चर्चा करून निर्णय घ्यायचा. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती.
45 वर्षांचा तरुण कुलगुरू म्हणून पुण्याला मान्य होईल का, त्यातून तो बहुजन समाजातील. शरद पवारांनी सगळ्यांना विचारून, मते घेऊन, चौकशी केली. अगदी ताकवले सगळ्यांना मान्य होतील का, इथपर्यंत विचारले. मी विद्यापीठातील प्राध्यापक, माझे शिकवण्याकडे आणि विद्यापीठातील सुधारणांकडे लक्ष असायचे. बाकी राजकारण माहीत नव्हते. अशा सगळ्या वातावरणात मी कुलगुरू झालो. साधारण प्रथा अशी होती की, कुलगुरू झाल्यावर मुख्यमंत्री पहिल्यांदा पुण्यात येतील तेव्हा त्यांची भेट घ्यायची.
त्यानुसार पवार पुण्यात आल्यावर त्यांना भेटायला गेलो. त्यांनी माझे स्वागत केले. मी त्यांना विचारले, आता कुलगुरू म्हणून माझ्याकडून काय अपेक्षा आहेत. त्यावर ते एवढेच म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत येऊ देऊ नका. एवढेच सांगितले. त्यानंतर त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टी विचारल्या नाहीत की सांगितल्या नाहीत. एकदा त्यांचा फोन आला. अमक्या कॉलेजच्या उद्घाटनाला उद्या जायचे आहे. त्याला मान्यता आहे का, असे त्यांनी विचारले. मी म्हणालो, विद्यापीठाची मान्यता नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी कार्यक्रम बदलला.
त्या महाविद्यालयाच्या उद्घाटनाला न जाता दुसऱ्या कार्यक्रमाला निघून गेले. ते कुठल्याही पदावर असले तरी कायम भान पाळायचे. त्यांनी एक मात्र चांगले केले. मला कुलगुरू म्हणून दुसरी टर्म मिळाली. सहा वर्षे चांगली गेली. त्याचप्रकारचे प्रशासन करण्याची इच्छा नव्हती. प्रशासन सांभाळताना शिकवणे बाजूलाच राहिले होते. त्यामुळे आता परत विद्यार्थ्यांना शिकवायचे असे मी ठरवले.
त्याचवेळी नागपूर विद्यापीठाचा कुलगुरूपदाचा प्रस्ताव आला. मला राज्यपालांनी बोलावून घेतले होते. मी नम्रपणे नकार दिला. कारण माझी सगळ्यात मोठी आवड म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणे. मी परत आलो आणि विद्यापीठात काम करू लागलो. रिसर्च वर्कर गोळा करण्यापासून पुन्हा सुरुवात केली. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना थायलंडमधील मुक्त विद्यापीठावरील एक माहितीपट त्यांना दाखवला. मुक्त विद्यापीठ कसे उपयुक्त आहे हे सांगितले. त्यांनी निलंगेकर मुख्यमंत्री असताना त्यांना सांगितले की, मुक्त विद्यापीठ झाले पाहिजे.
त्याचा रिपोर्ट करण्यासाठी ह्याला नेमा. मी मुक्त विद्यापीठाचा रिपोर्ट तयार करून सादर केला. त्यावेळी शंकरराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बाजूने नव्हते. त्यामुळे ते सगळेच बाजूला पडले. शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी याबाबतची चौकशी केली. रिपोर्ट घेतला. बिल मंजूर झाले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून माझी नियुक्ती झाली. पवारसाहेबांनी शिक्षणात, विकासात कधीच राजकारण आणले नाही.
संस्था उभारणी आणि चांगल्या व्यक्तींना संधी देणे हे त्यांचे कायमचे धोरण आहे. त्यांनी विचारले, किती निधी लागेल. मी माझा अंदाज सांगितला. ते मागेल तेवढे द्यायला तयार होते. मी सांगितल्यानुसार निधी लगेच मिळाला आणि विद्यापीठाचे काम सुरू झाले. नावारूपाला आले. नंतर पवार दिल्लीत गेले. इथे सुधाकरराव नाईक. ते आम्हांला गुरू म्हणायचे. परंतु होत काहीच नव्हते. पुन्हा शरद पवार आले. त्यांना सांगितले, पाच कोटींच्या बिल्डिंग बांधायला पैसे नाहीत. त्यांनी मला बोलावून घेतले. 27 मार्च 1992 रोजी त्यांच्याकडे गेलो.
मला बसवले. त्यांनी विचारले, किती गरज आहे? मी म्हणालो, पाच कोटी बांधकामाचा खर्च आहे. त्यांनी सचिवांना बोलावून घेतले. वेगवेगळ्या खात्यातील चार कोटी काढले आणि ह्यांना पैसे द्या म्हणून सचिवांना सांगितले. आणखी एक कोटी दिले. आमचा प्रश्न सोडवला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची दुसरी नियमानुसार मला दुसरी टर्म मिळाली. त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सचिवांनी दिल्लीला बोलावले. त्या विद्यापीठाची कुलगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारावी अशी त्यांची इच्छा होती.
त्यांना म्हणालो, इथले काम अर्धवट सोडून कसे येऊ? ते म्हणाले, तुमच्या कामामुळेच तर तुमच्या नावाची अनेकांकडून शिफारस करण्यात आली आहे. मी तिसऱ्या विद्यापीठाचा कुलगुरू झालो. तिथेही चांगले काम करता आले. एमकेसीएलची सुरुवात झाली. ओला आणि उबरचे मॉडेल आम्ही वापरलेले आहे. आज पंचवीस हजार लोक काम करत आहेत. शिक्षणातील संगणकीकरणाची क्रांती शरद पवारांच्या मार्गदर्शनामुळे झाली.