नवी दिल्ली : देशातील माओवादी हिंसाचाराचे क्षेत्र आक्रसत आहे. देशात केवळ 30 जिल्ह्यात हा हिंसाचार आता शिल्लक आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे.
देशात 2013 मध्ये 10 राज्यात 76 जिल्ह्यामधील 330 पोलिस ठाण्यात माओवादी हिंसाचार माजला होता. मात्र 2018 मध्ये तो 60 जिल्ह्यातील 251 पोलिस ठाण्यांपुरता मर्यादित झाला. डाव्या विचारसरणीच्या हिंसाचारबाधीत क्षेत्रातही घट होत आहे. सध्या तो केवळ 30 जिल्ह्यात सुरू आहे. माओवाद्यांनी आपले क्षेत्र विस्तारण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नाही, असे या अहवालात म्हटले आहे.
जानेवारी 2010 ते मार्च 2019 या काळात माओवादी हिंसाचाराच्या 11 हजार 668 घटनांत तीन हजार 782 जणअंनी आपले प्राण गमावले. त्यात सर्वाधिक छत्तिसगढमधील आहेत. नक्षलवादी हिंसाचारात गेल्या पाच वर्षात 26. 7 टक्के घट झाली. तर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील मृत्यूच्या संख्येत 39.5 टक्क्यांनी घट झाली. तर सुरक्षा दलाच्या जवानांच्या मृत्यूत 10.7 टक्क्यांनी घट झाली. तर माओवादी नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्याच्या घटनेत 65.4 टक्क्यांनी वाढ झाली. नक्षलवाद्यांमध्ये सर्वात खतरनाक असणाऱ्या सीपीआय (माओवादी) या संघटनेचे कंबरडे मोडले. त्यांच्या 88 टक्के नक्षलींना कंठस्नान घालण्यात आले आहे, असे या अहवालात म्हटले आहे.