मुंबई: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांवर देखील आरोप केले होते. दरम्यान, आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत नवे खुलासे आणि आरोप केले आहेत. तसेच त्यांनी वानखेडे यांच्या वडिलांना खुले आव्हान दिले आहे.
आज नवाब मलिक यांनी घेतलेल्या वानखेडेंच्या वडिलांवर केलेल्या आरोपांवर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे. यावेळी मलिक यांनी वानखेडेंनी मुस्लिम धर्म स्वीकारला. मात्र समीर वानखेडेंनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली. ही फसवणूक आहे. समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांवर मी ठाम आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी कोर्टाच्या कार्यवाहीला सामोरं जाण्यास तयार आहे, असं नवाब मलिक आज पत्रकार परिषदेत म्हणाले. वानखेडेंनी अनेक बड्या लोकांचे फोन टॅप केल्याचा आरोपही त्यांनी केला.
“मी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. माझी लढाई एनसीबीसोबत नाही. गेल्या ३५ वर्षात एनसीबीने खूप चांगले काम केले आहे. याआधी कोणीही एनसीबीच्या कामावर शंका उपस्थित केलेली नाही. पण एक व्यक्ती फसवणूक करून सरकारी नोकरी मिळवतो आणि जेव्हा मी या गोष्टी समोर आणल्या तेव्हा नवाब मलिक अधिकाऱ्याच्या खाजगी आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या भाष्य करत आहे असे म्हटले जाते. त्यांच्या कुटुंबातील लोकांना यामध्ये खेचले जात आहे असे म्हटले जात आहे. मी कोणाविषयी असा काहीही प्रकार केलेला नाही.
काल जे जन्म प्रमाणपत्र ट्विटरवर शेअर केले होते त्यावरून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मी हिंदू मुस्लिम म्हणून हे प्रकरण पुढे आणत नव्हतो. भाजपाने या प्रकरणात धर्मावरून प्रश्न उपस्थित केले. मी कधीही धर्माच्या नावावर राजकारण नाही केले हे लोकांनाही माहिती आहे,” असे नवाब मलिक म्हणाले.