नवी दिल्ली – काँग्रेस कार्यकारिणीच्या काॅंग्रेस वर्किंग कमिटीच्या (CWC) सोमवारी झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, आमच्याकडे कोणतीही जादूची कांडी नाही. केवळ निःस्वार्थ कार्य, शिस्त आणि सतत सामूहिक उद्देशाची भावना आपल्याला कार्य करण्यास सक्षम करेल.
सोनिया गांधी म्हणाल्या, पक्षाने आपल्या सर्वांचे भले केले आहे. आता ते कर्ज पूर्णपणे फेडण्याची वेळ आली आहे. आपल्याला निश्चितच आत्मपरिक्षणाची गरज आहे पण आत्मविश्वास आणि मनोधैर्य दुखावले जाईल आणि निराशेचे वातावरण निर्माण होईल अशा प्रकारे आत्मपरिक्षण करू नये. 13, 14 आणि 15 मे रोजी उदयपूरमध्ये सुमारे 400 काँग्रेस नेते ‘चिंतन शिविर’मध्ये सहभागी होणार आहेत. संतुलित प्रतिनिधित्व आणि समतोल सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. चिंतन शिबिरात सहा गटात चर्चा होणार आहे. यामध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक न्याय, शेतकरी, युवक आणि संघटना या विषयांवर चर्चा होणार आहे. याबाबत लोकप्रतिनिधींना यापूर्वीच कळविण्यात आले आहे.
वैचारिक, निवडणूक आणि व्यवस्थापकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी पुनर्रचित संघटनेची सुरुवात म्हणून या चिंतन शिबिराकडे पाहिले पाहिजे, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.