नवी दिल्ली – आग्रा येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. यमुनेचे पाणी ताजमहालाजवळील भिंतीपर्यंत पोहोचले आहे. येथे आता वाळूच्या पिशव्या लावून पाणी आत जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यमुनेचे पाणी सामान्य दिवसात खूपच कमी असल्याने यमुनेच्या काठावर पर्यटकांना बसण्यासाठी बाकही बसविण्यात आले आहेत.
ताजमहाल पाहण्यासाठी येणारे पर्यटक यमुनेच्या काठावर बांधलेल्या बाकांवर बसून या नदीचे पाणी पाहत असत, मात्र सध्या यमुनेला पूर आल्याने सर्व काही बंद आहे. पूर मदत कार्यात गुंतलेल्या लोकांनाच येथे जाण्याची परवानगी आहे. ताजमहाल जवळ बांधलेला दसरा घाटही पाण्यात बुडाला आहे. पोलिसांनी लोकांना घाटाच्या किनाऱ्यावर जाण्यापासून रोखले आहे.
आग्रा येथील यमुनेच्या पाण्याची पातळी अशीच वाढत राहिल्यास ताजमहाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा त्रास वाढू शकतो. यमुनेच्या काठावरचा रस्ता पाण्याने तुडुंब भरला आहे. पुराच्या धोक्याची भीती असलेल्या लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यमुनेचं वाढतं पाणी पाहून ते लवकरच ताजमहालच्या आत जाईल आणि ऐतिहासिक वास्तूची हानी होईल? असे अनेक प्रश्न सध्या समोर आले आहेत.
पण काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढली तरी ताजमहालच्या वास्तुवर त्याचा काही परिणाम होणार नाही आणि पूर आला तरी वास्तूच्या आत पाणी जाणार नाही. असं देखील सांगण्यात आलं आहे. 1978 मध्ये यमुनेचं पाणी ताजमहालच्या भिंतीपर्यंत पोहोचल्याचा प्रकार घडला होता, त्यानंतर यावर्षी त्याची पुनरावृत्ती आता झाली. पण जास्त पाणी साचलं तरी ताजमहालबद्दल काळजी करण्यासारखं काही नाही.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर देखरेख करणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात (एएसआय) या ऐतिहासिक वास्तूला पाण्यापासून कोणताही धोका नसल्याचं म्हटलं गेलं आहे. एएसआयचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ राज कुमार पटेल यांनी या संदर्भात माहिती दिली असून, ते सांगतात की, “पुराचं पाणी ताज महलमध्ये जाण्याची शक्यता नाही. या वास्तुला कोणत्याही प्रकारचा धोका नसावा, अशा पद्धतीने या वास्तुची रचना करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोठा पूर आला तरी ताजमहालमध्ये पाणी शिरु शकत नाही.
ताजमहालमधील मुख्य समाधी उंच मचाणावर बांधलेली आहे. तिच्या भोवती 42 विहिरी आहेत आणि विहिरींच्या वर साल लाकडाची रचना आहे. ताजमहाल एक प्रकारे लाकडाचा पाया रचून बांधला गेला आहे आणि त्या पाणी या लाकडांच्या संपर्कात आल्यास ती अजून मजबूत होतात. यावरुन असा अंदाज लावला जाऊ शकतो की ताजमहालची रचना एका खास पद्धतीने केली गेली आहे.
ज्यामुळे या वास्तुला कोणताही धोका नाही. ताजमहाल हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू असलेलं ठिकाण आहे. वर्षभरात अनेक विदेशी आणि भारतीय पर्यटक याठिकाणी या वास्तूला भेट देण्यासाठी येत असतात.