रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची दुःखद घटना बुधवारी रात्री घडली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी रस्ता नसल्याने येथे कोणतीही गाडी जाऊ शकत नाही. तसेच मुसळधार पाऊस आणि निसरडा रस्ता असल्याने येथे बचावकार्यत अडथळे निर्माण होत आहे. या घटनेवर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. मात्र या घटनेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यापूर्वीच एक विधान केले होते. ज्याचा व्हिडिओ मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.
११ जून २०२३ राज ठाकरेंनी भाषणात यावर्षीच्या पावसात कदाचित कोकणात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतील. शासन-प्रशासनाने जागृत राहावं, प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे असं त्यांनी म्हटलं होते. आज तेच हेच विधान आज खरे ठरले आहे. याशिवाय मनसेने हा व्हिडिओ शेअर करत ‘२० जुलै २०२३ रायगडच्या इर्शाळवाडीवर मध्यरात्री दरड कोसळणं आणि अख्खं गाव जमीनदोस्त होणं, माणसं दगावणं हे अतिशय वेदनादायी. महाराष्ट्र सरकारनं अशा नैसर्गिक दुर्घटनेत आपली माणसं मृत्युमुखी पडू नयेत म्हणून उपाययोजना करणं गरजेचं आहे. डोंगरपायथ्याशी असणाऱ्या वाडी-वस्तीचं पुनर्वसन कार्य हाती घ्यावं, पर्यावरण तज्ञांचा सल्ला घेऊन एक ‘पुनर्वसन योजना’ आणि डोंगरपायथ्याशी वस्ती असू नये किंवा बांधली जात असेल तर ती किती अंतरावर असावी याबाबत योजना आखावी.’
११ जून २०२३ – “यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतील असं दिसतंय… शासन-प्रशासनाने जागृत राहावं.” – राजसाहेब ठाकरे
आणि २० जुलै २०२३ रायगडच्या इरसालवाडीवर मध्यरात्री दरड कोसळणं आणि अख्खं गाव जमीनदोस्त होणं, माणसं दगावणं हे अतिशय वेदनादायी.
महाराष्ट्र सरकारनं अशा नैसर्गिक… pic.twitter.com/oG1xhsVNOa
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 20, 2023
तर राज ठाकरे यांनी देखील या घटनेवर ट्वीटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ‘रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं. खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा.’
रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 20, 2023
या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत, आणि इतर मंत्रांसह घटनास्थळी पोहचले. त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेची आणि आतापर्यंत केलेल्या बचावकार्याची माहिती सादर केली. ‘रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी ही वाडी आहे. येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे मानवली गावातून पायी चालत जावं लागतं. वाडीत ४८ कुटुंबं वास्तव्यास असून तिथली लोकसंख्या २२८ इतकी आहे. इथे गेल्या तीन दिवसांत ४९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.