अमरावती – राज्यभरात विविध ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत असून वीजा जमीनीवर पडण्याचे प्रमाण वाढत आहे. अशाच एका घटनेत पावसात झाडाचा आसरा घेऊन थांबलेल्या काका-पुतण्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथे घडली आहे. या घटनेत इतर आठ जण देखील जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरगड येथील एका शेतात शेतकरी आणि शेतमजुर शेतीचे काम करत होते. यावेळी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरु झाला. पाऊस सुरु झाल्यामुळे शेतातील सुरु असलेले काम थांबवून सर्वजण शेततील लिंबाच्या झाडाच्या आश्रयाला थांबले होते. यादरम्यान, अचानक झाडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत काका आणि पुतण्या अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. सुनिल मोती भास्कर (वय 32), निलेश बजरंग भास्कर (वय 20) असे मृत्यू पावलेल्या काका-पुतण्याचे नाव आहे.
या दुर्घटनेत सुनिल भास्कर यांचा जागीच मृत्यू झाला तर, निलेश भास्कर याला उपचारासाठी टेम्बुरसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच या शेतातच काम करणारे इतर आठ जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून पाणी घरात शिरले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. रात्री रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी आवश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच वीजांचा कडकडाट सुरू असताना शेतकऱ्यांनी झाडाच्या आसऱ्याला थांबू नये. झाडावर वीज कोसळन्याचे प्रमाण अधिक असते अशी माहिती देण्यात आली आहे.